गो गोवा..भाग २

>> शुक्रवार, १५ एप्रिल, २०११

भाग १ इथे वाचा                                                                                                    

प्रवासाने तशी दमणूक झाली होती. त्यामुळे लगेच त्याच दिवशी पाण्यात खेळायचा विचार नव्हताच. पण चौपाटीची मजा मात्र आम्ही घेणार होतो. आमच्या हॉटेलच्या मागे बीच वर जाण्यासाठी एक दार होते, आणि ते सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंतच उघडे असणार होते. आम्ही पावणे सातला तयार असल्यामुळे  त्या दारातून थेट किनाऱ्यावर गेलो. थोडासा अंधार पडायला सुरुवात झाली होती. फारसे पाण्यात न जाता "बीच वॉक" घेऊ असा विचार करून पावले बुडतील अश्या पाण्यातून रमत गमत चालत होतो. आमच्या हॉटेल च्या मागेच काही "शॅक" होते.
शॅक म्हणजे समुद्र किनार्यावर जमिनीपासून ३-४ फुटावर उभारलेला स्टेज सारखा एक "Platform". त्याला उंच बांबूचा आधार देऊन वर कुडाचं किंवा झापांचं छप्पर असतं. एखाद्या मोठ्या झोपडीसारखं. किनार्यावरचं गोवन हॉटेल.
संधीप्रकाशात समुद्राच्या लाटा समोरच्या किनाऱ्यावर आपटताना पाहात,  किंवा रात्री कॅण्डल लाईट मध्ये मस्त जेवण घेताना या शॅक मध्ये एकदम वेगळा फील येतो.

तर यापैकी अन्टोनिओ च्या  शॅक वर जाऊन खास गोवन फिश करी, रोटी आणि सोबतीला थंडगार बियर प्यायचा आमच्या बरोबरच्या मंडळींचा विचार होता. तशी चौकशी तिकडे करून आम्ही वाळूतून चालत चालत चौपाटीवर गेलो. महेंद्रकाकांच्या  ब्लॉगवर त्यांच्या गोवा ट्रीप बद्दल वाचलं होतं. कोलवा बीच वरच्या "चिकन शवारमा" चं त्यांनी केलेलं वर्णन आणि स्तुती वाचून ते खाणे हे एक प्रमुख आकर्षण होतं माझ्यासाठी. (वाचा इथे.. चिकन शवारमा) बरोबरच्या सगळ्या मांसाहारी पब्लिकला पण मी केलेल्या वर्णनामुळे फारच उत्सुकता लागली होती ते खायची.
त्यामुळे सगळ्यांची पावलं पटापट पडत होती. बीच वर पोचलो, पण ती गाडी काही कुठे दिसेना.  अंधार पण झाला होता बराच. पण जरा शोधल्यावर एका छोट्या पुलाच्या ( पूल म्हणजे बागेत वगैरे ओढा ओलांडण्यासाठी छोटासा अर्धवर्तुळाकार पूल असतो ना तसा.)  पलीकडे ती गाडी दिसली एकदाची. हुश्श!!!

त्याचा लुक, वास, आणि बनवण्याची पद्धत इतकी झकास होती की सगळ्यांनी २-२ तरी खाल्ले असतील. उद्या पुन्हा संध्याकाळी यायचं असं लगेच ठरवून टाकलं मंडळींनी.
समुद्रकिनार्यावर मिळणारं "बुढढी के बाल" मला प्रचंड आवडतं. आजकाल रस्तोरस्ती काठीला लटकावून फेरीवाले विकतात ते, पण बीच वर खाण्यात वेगळी मजा आहे. त्या खारट हवेत गोडमिट्ट कापूस खायला भारी वाटतं अगदी. तो माणूस दिसल्यावर मोर्चा तिकडे वळला. मी ते खाणार हे कळल्यावर बरोबरच्या माझ्याहून १-२ वर्षांनीच मोठ्या असलेल्या लोकांनी "लहान मुलांसारखं काय करतेय?" अशा प्रतिक्रिया लगेच व्यक्त केल्या.(अहो पुण्याचे ते, बोलण्यात ऐकणार नाहीत, आणि बोलायचं थांबणार नाहीत) पण माझ्या तोंडाकडे बघत बसण्यापेक्षा त्यांनीही ते एन्जॉय केलं नंतर.

हे होतंय तोवर कुणाला तरी "गरम कुत्ता" (हॉट डॉग) ची पाटी दिसली. तिथे धडक मारून झाली. मी "चिकन हॉट डॉग विथ मेक्सिकन साल्सा आणि मस्टर्ड सॉस" घेतला  पण फारसा आवडला नाही तो प्रकार. बरा होता.

आता एवढ हाणल्यावर कुणाला जेवायचा विचार मनात येऊ शकेल का? पण नाही, आता काय जेवायचं ही चर्चा सुरु झाली. तिथेच "सबवे" होतं, पण नुसत्या रोल ने कसं काय पोट भरेल म्हणून सगळा मोर्चा आम्ही राहिलेल्या हॉटेल कडे वळला. या हॉटेल मध्ये राहायची सोय ठीकठाक आहे, पण जेवणाच्या नावाने नुसता शंख आहे.. मेनुकार्ड वर विशेष डिशच नाहीयेत. काहीतरी सटरफटर मागवलं. गोव्यात येणारयाला मुख्य आकर्षण असतं ते मासे आणि दारू. पैकी, मी मासे खाते. पण फार आवडीने नाही. पण बरोबरच्या मंडळींना खाणे आणि पिणे या दोन्हीत इंटरेस्ट होता. (बिचारा माझा नवरा. तो पक्का शाकाहारी आहे. ३ दिवस चायनीज वरच होता तो.) इथे मी पहिल्यांदा अल्कोहोलिक पेय प्यायले. फार नाही, ब्रीझर घेतली थोडीशी. बरी होती चव. लोकांना दारूची चव कशी काय आवडते देव जाणे. झेंडेवालं हॉटेल असल्यामुळे जेवण अर्थातच महाग होतं. त्या ब्रीझर मुळे  मला फार झोप यायला लागली होती, त्यामुळे मी फक्त डेझर्ट खाल्लं, कॅरामल पुडिंग, आपल्या गुडलक मध्ये मिळतं तेच. पण किंमत दुप्पट. चालायचंच. स्थलमहात्म्य!!  जेवणं झाल्यावर दुसरे दिवशी सकाळी समुद्रात खेळायला जायचा बेत पक्का करून आम्ही आपापल्या खोल्यात गेलो. समुद्राच्या वाळूत चालणं अवघड असतं. त्यात ११ तास प्रवास झालेला. त्यामुळे आणि वाळूत पाय ओढत चालून चालून पायाचा पार बुकणा पडला होता. कधी झोपलो कळलंच नाही. 
                                                                                                                                          भाग ३ 

Read more...

गो गोवा.. भाग १..

>> बुधवार, १३ एप्रिल, २०११

रोजचंच काम, तेच ते रुटीन आणि बरेच दिवसात कुठेही टवाळक्या करायला न गेल्यामुळे आलेला कंटाळा.. या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग.. तो म्हणजे २-३ दिवस कुठेतरी भटकंती करून येणे. माझ्यासारखे बरेच जण होते जे जाम पकले होते त्याच त्या दिनक्रमाला. काय करावं असा विचार करता करता शेवटी, "एक ट्रीप काढू" हा विचार पक्का झाला आणि ट्रीपची ठिकाणं एकेकाच्या सुपीक मेंदूतून बाहेर यायला लागली. आम्ही ७-८ जण होतो, आणि सगळ्यांनी त्यांच्या लहानपणी कधीतरी गोवा पाहिलेलं होतं, त्यामुळे गोवा फायनल केलं. ९-१०-११ एप्रिल चा विकेंड ठरला. 

९ एप्रिल, शनिवार.. सकाळी ६ वाजता "बाप्पा मोरया" करून आम्ही "पुणे टू गोवा" या आमच्या सफरीला आरंभ केला. आमच्या ग्रुप मध्ये माझ्या नणंदेचा २ वर्षाचा मुलगा होता. त्यामुळे  मस्त टाईमपास होता सगळ्यांना. त्याच्याशी बडबड करत आणि त्याच्या बोबड्या बोलण्याचे अर्थ काढत आमचा प्रवास सुरु झाला.
आमच्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे प्रवास सुरु करून एखाद-दोन तास झाले की सगळ्यांना तहान, भूक लागायला सुरुवात होते. त्यामुळे आम्ही जेमतेम खंबाटकी घाट उतरलो असू, इतक्यात माझ्या दिराला तहान लागली.. नवऱ्याला भुकेची जाणीव झाली तर कुणाला मळमळायला लागलं. २ तास एका जागी बसल्यामुळे आपल्याला वाळवी लागेल की काय ही भीती वाटत असावी बहुतेक . तसंच सगळ्यांना दामटून बसवून शेवटी साताऱ्याजवळच्या "अतीत" या गावातल्या बस स्थानकावर गाडी थांबवली. या अतीत स्थानकावर वडापाव फार छान मिळतो. पुणे-सांगली विनाथांबा एशियाड ने जाताना बस इथेच फक्त थांबते. त्यामुळे आम्हाला इथल्या वडापावाची ख्याती माहीत आहेच. इथला वडापाव न खाता पुढे गेलो तर त्या कॅन्टीनवाल्याला किती वाईट वाटेल असा विचार करून आम्ही सगळ्यांनी फक्त वडापावच नाही तर तिथे तयार असणाऱ्या सर्व नाश्ता आयटम्स वर ताव मारला. उदा. उप्पीट, पोहे, भजी, इडली, शिरा इ इ. मग चहा झाला. निसर्गाच्या हाकेला "ओ" देऊन झाली. आणि अर्धा पाऊण तास खाण्यापिण्यात गेल्यावर आम्ही सगळे परत गाडीत बसलो. 

गोव्याला जायला २ मार्ग आहेत, एक कोल्हापूर-गगनबावडा मार्गे तर दुसरा आंबोली मार्गे. आंबोली मार्गे गेलं तर मधेच थोडासा कर्नाटकाचा भाग येतो. आणि त्या ५० किमी साठी इन-आउट चेकिंग आणि एन्ट्री टोल भरायचे उपद्व्याप करावे लागतात. म्हणून आम्ही "महाराष्ट्र देशा"तूनच जायचं ठरवलं. कोल्हापूर पास करून गगनबावड्याच्या मार्गाला लागलो. गगनबावडा जंगल शिकारीसाठी प्रसिध्द आहे. तिथे वाघ, तरस, रानडुक्कर असे जंगली प्राणी खूप आहेत. गगनबावड्याला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणतात इतका पाउस पडतो तिथे. पावसाळ्यात ५ फुटावरचं सुद्धा दिसत नाही. घाटाचा रस्ता अगदी व्यवस्थित आहे पण वळणं मात्र अवघड आहेत. हा घाट उतरला की लगेच कोकण सुरु होतं. आम्हा सगळ्यांनाच हा रस्ता नवीन होता, त्यामुळे सगळे एकदम शांत बसून निरीक्षण करत होतो. अचानक आमच्यातल्या ज्यूनिअरला काहीतरी दिसलं आणि त्याचं "प्पा प्पा" सुरु झालं. त्याला माकडांची मोठ्ठी टोळी दिसली होती. (प्पा = हुप्प्या, समजून घ्यायचं आपणच) मग त्याला त्याचे (म्हणजे सगळ्यांचेच) पूर्वज दाखवण्यासाठी आम्ही थांबलो. समोर सह्याद्रीच्या मस्त रांगा दिसत होत्या त्यामुळे खास गोवा ट्रीप साठी घेतलेल्या कॅमेरयाचं उदघाटन मी तो देखावा टिपून केलं.

त्या माकडांच्या टोळीमध्ये एक लेकुरवाळी माकडीण होती. ती कठड्यावर मस्त पोज देऊन बसली होती पिल्लाला कुशीत घेऊन. तिचा फोटो काढल्याशिवाय पुढे जाववेना. तिला कॅमेऱ्यात बंद करून आणि अजून २-३ फोटो मारून परत गाडीत बसलो. 
कणकवली मागे टाकून सावंतवाडीच्या मार्गाला लागलो. आता पोटात कावळे झिम्मा खेळायला लागले होते. त्यामुळे सावंतवाडीत जेवायचं पक्कं केलंच होतं. सावंतवाडी बस स्थानकापासून ३-४ किमी वरच एक छानसं हॉटेल दिसलं. "शिवास" नावाचं (आमच्यातल्या "पेयपान करणाऱ्या" लोकांना ते नाव इतकं आवडलं की त्यांनी तिथेच जेवायचं आग्रह धरला) . त्या हॉटेलचं प्रथमदर्शनच इतकं छान होतं की जेवण पण चांगलं असेल, असं उगीचच वाटलं. आणि खरचं आमचा विश्वास सार्थ ठरला. जेवण अप्रतिम होतं. खास कोंकणी मसाल्यातील फिश करी, सुरमई फ्राय, मलई कोफ्ता आणि दाल खिचडी वर ताव मारून आणि हॉटेलच्या आजूबाजूच्या बागेतल्या झाडांना लगडलेले आंबे, फणस बघून पुढच्या प्रवासाला लागलो.

आम्ही मडगावला राहणार होतो. सावंतवाडी-मडगाव साधारण ९० किमी आहे. मध्ये महाराष्ट्र सरकारची हद्द संपताना एक चेकपोस्ट आहे. तिथे ड्रायव्हरचा लायसन्स वगैरे तपासणी झाली. थोडं पुढं जातोय तोच गोवा सरकारचं चेक पोस्ट आहे. तिथेही तोच उद्योग झाला. असं सगळं होऊन आम्ही पणजीत प्रवेश केला. मांडवी नदीत विहरणाऱ्या  असंख्य बोटी पाहून खऱ्या अर्थाने गोव्यात आल्यासारखं वाटलं. विजय मल्ल्याची बोट पण तिथे नांगरून ठेवलेली होती. मनात विचार केला, असेल काय "दीपिका" आत? असो बापडी..   आपल्याला काय...

आमचं हॉटेल कोलवा बीच वर होतं. खोल्या पण सी-फेसिंग होत्या. बाल्कनी उघडली आणि समोर समुद्र दिसल्यावर काय भारी वाटलं म्हणून सांगू... अहाहा.
मला दर वेळी समुद्र पाहिला की वाटतं सांगलीला, किंवा पुण्याला (मी इथे राहते म्हणून ही दोन शहरं बरं का) का नाही समुद्र? पण मग त्या दमट हवामानाची आठवण झाली की वाटतं बरंय जे आहेत ते... जेव्हा समुद्रावर खेळावंसं वाटेल तेव्हा जाऊ असंच कुठेतरी..    
इथेही हवा गरम होती, पण त्या किनाऱ्यावर झेपावणाऱ्या लाटा पाहिल्या, ती गाज ऐकली आणि माफ केलं त्या हवेला..

फ्रेश होऊन समुद्रावर चक्कर मारून यायचं असं ठरवलं. तिथे काही खास आकर्षणं होती.. त्या साठी मला जायचंच होतं. गैरसमज करून घेऊ नका. आम्हाला आपलं खाण्यापिण्याच्या ठिकाणांचं आकर्षण आहे. तुमचं काय आहे ते बघा बुवा तुम्हीच..

कोलवा बीच वर काय केलं, गोव्यात काय काय पाहिलं, काय काय खाल्लं ते पुढच्या भागात लिहीनच. तोपर्यंत बाय बाय!! 

                                                                                                                                          भाग २

Read more...

प्रवास- ध्येयपूर्तीचा

>> सोमवार, ७ मार्च, २०११

एक छोटंसं गाव होतं. हिरवाईनं नटलेलं. शहरीपणाचा स्पर्शही न झालेलं आणि अजूनही माणुसकी जागृत असलेलं. तिथल्या सगळ्या ग्रामस्थांच्या मनात एकमेकांबद्दल आदर होता, प्रेम होतं, आपलेपणाची भावना होती.  अजूनही एखादा माणूस गांव सोडून चालला की सगळे डोळे पाणावत असत, आणि नवा कोणी गावात राहायला आला तर त्याला मदत करण्यासाठी लोकांच्यात अहमहमिका लागत असे.

कुणाला कसलं बक्षीस मिळालं, कुणाचा मुलगा नोकरीला लागला, कुणाला अपत्य झालं की सामुदाईक समारंभ होत असत, आणि त्यांचं कौतुक केलं जात असे. कुणी एखादी कला सादर करत असेल, तर त्याचा सन्मान होत असे. अतिशय गुणग्राहक अशी गावकऱ्यांची ख्याती होती.

या गावात एक कुटुंब राहत होतं. इन मीन तीन माणसं घरात. आई-वडील आणि मुलगा. हे लोक नुकतेच म्हणजे २ एक महिन्यांपूर्वीच त्या गावात राहायला आले होते. आधी ते कुठेतरी नागपूर जवळ राहत होते, आणि बदली झाल्यामुळे इथे आले होते. त्याचं मूळ गांव मध्यप्रदेशात होतं. त्यामुळे त्यांच्या ओळखीचं, नात्याचं गावात कुणीच नव्हतं.

श्रीनिवासराव शेजारच्या गावातल्या बँकेत काम करत असत, तर अंजलीताई गावातल्याच प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. मुलगा अजून लहान असल्याने शेजारच्या काकूंकडे दिवसभर असायचा. त्या ही त्याला मायेने सांभाळायच्या. एकंदरीत काय तर सगळं सुखेनैव चाललं होतं.

एक दिवस श्रीनिवासराव कामावरून परत येत असताना त्यांना गावाबाहेरच्या मैदानावर खूप गर्दी दिसली. कसले कसले तंबू लावणं चाललं होतं. एकीकडे मोठी चूल पेटली होती. घोळके करून माणसं बसलेली दिसत होती. मधेच बारक्या पोरांचं रडणं कानावर पडत होतं. एकूण काय तर सगळीकडे धांदल, गडबड होती. त्या दिवशी श्रीनिवासरावांना बऱ्यापैकी उशीर झालेला असल्यामुळे या सर्व प्रकाराकडे लक्ष न देता ते तडक घरी निघून गेले. त्यानंतर रविवार असल्यामुळे ही गोष्ट घरी सांगायचेही विसरून गेले.

रविवारी त्यांच्या लाडक्या लेकाचा २ रा वाढदिवस. नातेवाईक जरी नसले गावात, तरी समस्त गावकरी हेच जीवाभावाचे झालेले.  त्यामुळे घरी ५-५० लोक जेवायला. अंजलीताई अतिशय गडबडीत होत्या. जेवणखाण अगदी उत्तम झालं.  रात्री दोघे गप्पा मारत बसले होते. मुलगा खेळून खेळून दमून झोपून गेला होता. "वाढदिवस किती छान झाला, सगळे किती प्रेम करतात ना आपल्यावर?" असे विचार श्रीनिवासरावांच्या मनात येत होते. तर "आपली पुण्याई म्हणून असे शेजारी आणि सखे सोबती आपल्याला मिळाले" असं अंजलीताई म्हणत होत्या.

एका बाजूला मिळालेल्या भेटवस्तू उघडून त्यावर चर्चा चालू होतीच. मुलाला आत्ता लगेच वापरता येतील अश्या वस्तू, खेळणी इ. समान बाजूला काढण्यात अंजलीताई मग्न होत्या. अचानक श्रीनिवासरावांना आठवला तो गावाबाहेरच्या मैदानावरचा गोंधळ. त्यांनी सगळं वर्णन अंजलीताईंपाशी केलं. दोघांनाही एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं, की २ दिवस हे लोक त्या मैदानावर आहेत आणि गावकरयांपैकी कुणीच हा विषय कसा काय काढला नाही. दुसऱ्या दिवशी इतरांशी या विषयावर बोलायचं असं ठरवून दोघेही झोपी गेले.

सकाळ झाली. हा विषय संध्याकाळी कामावरून आल्यावर निवांत काढावा, असा श्रीनिवासरावांचा विचार होता कारण त्यांना ८ वाजताच निघावं लागे, इतक्या सकाळी दुसऱ्यांना कशाला त्रास द्यायचा असं त्यांना वाटत होतं. अंजलीताईनी नवऱ्याचा, आपला आणि मुलाचा डबा तयार केला. श्रीनिवासराव बाहेर पडल्यानंतर मुलाला अंघोळ वगैरे घालून, स्वत:चं आवरून शेजारच्या काकूंकडे त्याला सोडायचं हा त्यांचा दिनक्रम होता. त्याप्रमाणे काम आटोपून त्याही शाळेत निघून गेल्या. श्रीनिवासरावांनी ठरवलं होतं की बँकेत जाताजाताच काय प्रकार आहे ते पाहून जायचं. त्याप्रमाणे ते गावाबाहेरच्या मैदानापाशी आले. आत्ताही तिथे तीच वर्दळ होती. त्यांना परत आश्चर्य वाटलं की गावातल्या कुणालाच कसा पत्ता नाही या लोकांचा. आता तिथे जवळजवळ ८-१० तंबू उभे होते. त्यापैकी सगळ्यात मोठ्या तंबूत जाऊन चौकशी करायचं त्यांनी ठरवलं.

आपली स्कूटर त्या मैदानात लावून श्रीनिवासराव त्या तंबूकडे निघाले. तंबूत ७-८ माणसं काहीतरी बोलत बसली होती.

त्यांना नमस्कार करून श्रीनिवासरावांनी विचारलं, "आपण कोण, कुठले, काय हेतूने इथे आलात?"

त्यांच्यातल्या एका वयस्कर दिसणाऱ्या माणसाने प्रतिनमस्कार  करून उत्तर दिलं, " आम्ही खूप लांबून आलोय, विदर्भातून. लोककलाकार आहोत आम्ही. तमाशा चालवतो. या गावाबद्दल, आणि गावातल्या लोकांच्या कलाप्रेमाबद्दल खूप ऐकलं होतं, म्हणून आमची कला सादर करायला इथे आलो आहोत."

हे सर्व ऐकल्यावर श्रीनिवासराव  जरा चिंतेत पडले. "आत्तापर्यंत तमाशा हा प्रकार त्या गावातल्या लोकांनी फक्त मराठी चित्रपटात पाहिलेला. जरी गाव कलाप्रेमी असला तरी तमाशा म्हणजे... तमाशा आला की नाचणाऱ्या बायका आल्याच. जर त्यांच्यामुळे या गावात काही गोंधळ झाला तर? गुण्यागोविंदाने राहत असलेले लोक एकमेकांच्या जीवावर उठले तर?" श्रीनिवासरावांच्या मनात विचार येत होते. ते ज्या गावातून आले होते, त्या गावात सतत भांडणं आणि मारामाऱ्या होत असत आणि त्या भांडणांना सुरुवात ही गावात नव्याने सुरु झालेल्या मुजरा कार्यक्रमातून झाली होती. एका कार्यक्रमासाठी आलेल्या कलावंतिणी जेव्हा गावातच माडी बांधून राहू लागल्या, तेव्हा तर त्या भांडणांना उत आला होता. गावातले राजकारणी, त्यांची उनाड पोरं आणि त्या कलावंतीणीची "दीदी" यांच्यातल्या राजकारणामुळे गावातली तरणीताठी कमावती मुलं त्यांच्या नादी लागून वाया गेलेली श्रीनिवासरावांनी पहिली होती.

हे सगळं चित्र झर्रकन त्यांच्या नजरेसमोरून निघून गेलं, आणि ते वास्तवात आले. समोरचा माणूस अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत होता. त्याला पंचायतीला भेटायला सांगून व परवानगी मिळाली तरच पुढे जा असं सांगून  ते कामावर निघून गेले.

दिवसभर त्यांच्या डोक्यातून हा विषय जात नव्हता आणि एक कटू आठवण सारखी मन:पटलावर यायला पाहत होती.

त्यांची एकुलती एक धाकटी बहिण नर्मदा. १० वर्षांनी लहान. सगळ्यांची खूप लाडकी. अतिशय सुंदर, हुशार, अल्लड आणि अवखळ. शाळेत कायम पहिल्या क्रमांकावर असायची. नवनवीन गोष्टींचं खूप कुतूहल होतं तिला. ते शमवता शमवता घरच्यांच्या नाकी नऊ यायचे. पण एकच चिंतेची गोष्ट होती तिच्या बाबतीत. म्हणजे त्या काळी चिंतेचीच म्हणावी लागेल. नाचाची अतिशय आवड होती तिला. सतत आरश्यासमोर उभी राहून गिरक्या घेत असायची. पण एका सनातनी मध्यमवर्गीय कुटुंबात हे कसं काय खपायचं? वडिलांची सक्त ताकीद होती घरच्यांना की हिला समजावा आणि तिचं नाचणं बंद करा नाहीतर तिचं शिक्षण बंद करेन. पण आपली आवड अशी कोणी दाबून ठेऊ शकतं का? तिलाही ते जमलं नाही. ती गुपचूप एका मैत्रिणीकडे जाऊन नाचाचा सराव करत असे. त्या मैत्रिणीच्या आई बद्दल गावात फारसं चांगल मत नव्हतं, ती पुरुषांना भुलवते असं काही लोकांचं म्हणणं होतं. ती हिला नाच शिकवत असे. अर्थात हे सगळं तिच्या वडिलांना माहित नव्हतंच.

अशीच काही वर्षं गेली. नर्मदा १६ वर्षांची झाली. शिक्षण चालू होताच उत्तम प्रकारे, आणि नृत्यातही पारंगत झाली ती. त्याच सुमारास श्रीनिवासरावांना चांगल्या नोकरीची संधी मिळाल्यामुळे ते गाव सोडून नोकरीच्या गावी राहायला गेले. नुकतंच लग्न झालेलं असल्यामुळे पत्नीलाही सोबत घेऊन गेले. नोकरीच्या व्यापात इतके गुरफटले की गावी जाणं २-३ वर्षं जमलंच नाही. पण बहिणीशी त्यांचा पत्रव्यवहार चालूच होता. आई-वडिलांबद्दल खुशाली कळत होती.अधूनमधून साडी, पैसे अशी भाऊबीज, दिवाळी नसली तरी गावी पोचत होती. तिच्या पत्रांतून गावात झालेल्या मुजरा कार्यक्रमाबद्दल कळलं होतं. त्यानंतर झालेल्या मारामारयांबद्दलही उल्लेख होता. आणि अचानक एक दिवस तिची पत्रं येणं बंद झालं होतं. बरेच दिवस वाट पाहूनही काहीच कळलं नाही म्हणून त्यांनी गावी धाव घेतली होती. आणि एक खळबळजनक माहिती समोर आली होती.

नर्मदेने स्वेच्छेने त्या कलावंतीणीच्या मेळ्यात प्रवेश केला होता. आणि त्या गोष्टीची शरम असह्य होऊन  त्यांच्या आई-वडिलांनी अंथरूण धरले होते. गावकऱ्यानी त्यांना जवळजवळ वाळीत टाकल्यातच जमा होतं. त्यामुळे आई-वडील आजारी असल्याची बातमी कुणीही त्यांच्यापर्यंत पोचवली नव्हती. आपल्या गावात निर्माण झालेल्या अशांततेचे कारण तो मेळाच आहे असे (फारच उशिरा) गावकर्यांच्या लक्षात आल्यामुळे त्या कलावंतिणीनाही गाव सोडून जायला भाग पाडण्यात आले होते. त्यामुळे नर्मदेचा ठावठिकाणाही कळत नव्हता. अश्यात मुलाला समोर पाहून त्यांच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले होते. "नर्मदेला शोधून काढ आणि तिला त्या नरकातून सोडव" असे वचन मुलाकडून घेऊन त्या माउलीने डोळे मिटले ते कायमचेच. श्रीनिवासरावांनी पत्नीला बोलावून घेतले होते, व आईचे सर्व अंत्यसंस्कार होईपर्यंत तिथेच राहायचं त्यांनी ठरवलं. पण आईपाठोपाठ ८ दिवसांनी वडिलांनीही श्वास सोडला. सर्व विधी आटोपून, दोघे परत आले तेच मुळी त्या गावाची नाळ तोडून.

हे सगळं दृश्य एखाद्या चित्रपटासारखं नजरेसमोरून सरकत गेलं, आणि श्रीनिवासरावांना तो तमाशाचा फड आठवला. मनोमन त्यांनी प्रार्थनाही केली देवाची, की नको देवा, यांना परवानगी नको मिळूदे आमच्या गावात फड उभारण्याची. अजून किती नर्मदा त्यांना भुलतील आणि आयुष्याची नासाडी करून घेतील कोण जाणे..   

विचारात गुरफटलेल्या अवस्थेतच ते घरी आले. अंजलीताईनी ओळखलं की काहीतरी सलतंय यांच्या मनात. पण काही विचारायच्या आतच श्रीनिवासरावांनी सगळा प्रकार त्यांना सांगितला. दोघेही गंभीर झाले, आणि तडक गाव प्रमुखाकडे गेले. ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली, आणि परवानगी दिल्यास त्याबरोबर काय काय घडू शकतं याचीही कल्पना दिली. मामला गंभीर आहे हे लक्षात आल्यावर प्रमुखांनी समस्त गावाची सभा बोलावली, आणि त्या तमाशाच्या व्यवस्थापकालाही बोलावणं धाडलं. सभेमध्ये झालेल्या चर्चेतून आणि सर्व शक्याशक्यतांचा विचार करून तमाशाला परवानगी नाकारण्यात आली. व्यवस्थापकाने खूप प्रयत्न केला सांगायचा की आमच्या तमाशातले सर्व कलाकार हे चांगले आहेत, त्यांच्यामुळे तुमच्या गावाच्या सौख्यात काहीच बाधा येणार नाही. पण पंचायतीने त्यांना फड लावायला नकार दिला.

कष्टी मनाने तो फडावर परत आला, व काम करणाऱ्यांना तंबू उठवायची सूचना दिली. सर्व जण एकदम अवाक झाले. इतके श्रम करून उभा केलेला फड असा एका रात्रीत उठवायचा? एकदम गोंधळ उडाला तिथे.

कसला एवढा आवाज चालू आहे, असा विचार करत तमाशाची मुख्य नृत्यांगना , आणि मालकीण सुंदराबाई जबलपूरकर बाहेर आल्या आणि व्यवस्थापकांना विचारले, "काय हो, का एवढा कालवा करताय? झालं तरी काय असं?"

तेव्हा त्यांच्या फडावर गावकऱ्यांनी आणलेली संक्रांत त्यांना समजली.

"मी जाते त्यांच्याकडे आणि बोलते, पाहू काय होतं ते, तो पर्यंत तंबू उठवायची घाई करू नका" असं सांगून आणि व्यवस्थापकांना सोबत घेऊन सुंदराबाई गावप्रमुखांकडे निघाल्या.

सुंदराबाई जबलपूरकर या प्रख्यात तमाशा कलाकार होत्या. त्यांनी खूप कष्टाने त्यांचा फड नावारूपाला आणला होता. स्वत: ला सिध्द करताना झालेला प्रचंड त्रास, समाजाची अवहेलना, पुरुषांची वाईट नजर आणि स्त्रियांचा तिरस्कार त्यांनी अनुभवला होता. पण स्वत:च्या इज्जतीला आणि इभ्रतीला तडा जाईल अशी कुठलीही गोष्ट त्यांच्या हातून कधी घडली नव्हती. त्यांच्या तमाशात नाचणाऱ्या मुली त्यांच्या हाती सुरक्षित होत्या. त्या मुलींबाबत कुठलाही गैरव्यवहार सुंदराबाईनी कधीच होऊ दिला नव्हता. डोळ्यात तेल घालून मुलींच्या अब्रूचं रक्षण केलं होतं. त्यामुळे "कर नाही त्याला डर कशाला" असं म्हणत गावप्रमुखाना भेटायला जातीने जाण्यात त्यांना काहीच अडचण नव्हती.

विचारांच्या नादात त्या प्रमुखांच्या घरासमोर पोचल्या. ही घरंदाज दिसणारी बाई कोण असा विचार करत प्रमुखांनी त्यांना ओसरीवर बसवले. पाणी, गूळ दिला. सुंदराबाईनी स्वत:ची ओळख करून दिली. येण्याचा उद्देश सांगितला. तो ऐकल्यावर गाव प्रमुखांनी परत गावातल्या प्रसिध्द आणि मानाच्या व्यक्तींना बोलावणं पाठवलं. सर्व जमल्यावर सुंदराबाईनी त्यांची कहाणी सुरु केली. त्या सर्व मंडळींकडे पाठ करूनच बोलत होत्या. त्यामुळे लोकांना कळत नव्हते की ही धडाडीची बाई आहे तरी कोण. पण सर्व मनापासून त्यांची कहाणी ऐकत होते.

"मी एका सुशिक्षित, साधन कुटुंबातली हुशार मुलगी. मला नृत्याची, विशेष करून लोकनृत्याची विलक्षण आवड होती. पण त्या काळी चांगल्या घरातल्या मुलीला हा मार्ग उपलब्धच नव्हता. मलाही नव्हता. पण माझ्या ह्या ध्येयाने मी इतकी झपाटली गेले की मी घर सोडून एका मेळ्यात प्रवेश केला, आणि माझं घरदार मला तुटलं ते कायमचं." सुंदराबाई बोलत होत्या. उपस्थित कुतूहलाने ऐकत होते.

"त्या मेळ्यात काही वाईट अनुभव आले, आणि मी तो मेळा सोडला. जबलपूरहून महाराष्ट्रात आले, आणि लावणी या लोककलेच्या प्रेमात पडले. नृत्यात तर मी पारंगत होतेच, पण लावणीसाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागली. पंडित किशन महाराजांकडे ही कला शिकले, आणि "ज्यात शृंगार असेल पण पुराणातल्या कथाही असतील, ज्यात कला असेल, आणि निर्भेळ करमणूकही असेल, ज्यात संगीत असेल आणि नृत्यही असेल" असा सर्वगुणसंपन्न तमाशा काढायचा हे माझ्या मनाने घेतलं. मी तयारी सुरु केली. दरम्यान माझी गाठ माझ्यासारख्याच ध्येयाने पछाडलेल्या श्री. जबलपूरकर यांच्याशी पडली. मी त्यांच्या प्रेमात पडले, व आम्ही लग्न केलं. नव्या दमानं कामाला लागलो, व तमाशा उभा केला. माझ्या तमाशात नाचणाऱ्या सगळ्या मुली या परिस्थितीमुळे तमाशात काम करत नाहीत,तर त्या चांगल्या घरच्या मुली आहेत, नृत्याची आवड म्हणून त्या इथे काम करतात. जसं मी माझ शील सांभाळलं तसंच त्यांच्यापैकी कुणाचंही पाऊल वाकडं पडलेलं नाही आणि पडणारही नाही. मी खात्री देते. हे एवढं ऐकूनही जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या तमाशाला परवानगी द्यायची नाही, तर आम्ही उद्या सकाळी त्या मैदानावर नसू, याचीही खात्री देते."

एवढं बोलून सुंदराबाई वळल्या, सर्वाना नमस्कार केला, व चालू लागल्या. श्रीनिवासरावांना एकदम काहीतरी वाटले, आणि ते ओरडले, "नर्मदे, थांब."

गाव दचकला. सुंदराबाई थबकल्या. गर्रकन वळल्या, आणि आपल्याकडे येणाऱ्या आपल्या सख्या मोठ्या भावाला पाहून चकित झाल्या. दोघेही समोरासमोर आले, आणि पाणावल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत राहिले.

"दादा, मी चूक नाही केली रे, माझ्यामुळे आपल्या घराण्याची बदनामी होईल असं जे आई-बाबांना वाटत होतं, त्यासाठी मी नाव बदललं. मी अजूनही तशीच आहे, स्वच्छ,  न डागाळलेली. तू पण माझ्याबद्दल असाच विचार करत होतास का?"

श्रीनिवासरावांनी "नाही" अशी मान डोलावली,  बहिणीला आपल्या जवळ घेतलं आणि आशीर्वाद दिला. "आयुष्यमान भव, सदा सुखी राहा, तुझ्या पाठीशी तुझा भाऊ भक्कमपणे उभा आहे"

"आम्ही पण" हेलावलेले गावकरी ओरडले, आणि एकच जल्लोष झाला...

 

Read more...

हसरा निसर्ग, देव देव आणि लवासा.

>> शुक्रवार, २८ जानेवारी, २०११


शीर्षक वाचून तुमच्या मनात गोंधळ उडालेला दिसतोय मला. :)
त्याचं काय झालं, मागच्या शनिवार-रविवारी माझे सासू-सासरे आमच्याकडे आले होते. आम्ही दोघेही सुट्टी असल्यामुळे घरी होतो.  २ दिवस काय काय करायचं याचे मनसुबे १ आठवडा आधीपासूनच मनात घोळत होते. शेवटी त्या दोघांना विचारून एक छोटीशी ट्रीप काढायचं नक्की झालं. पुण्यापासून ४० एक किलोमीटर अंतरावर "हाडशी"  नावाचं एक ठिकाण आहे. आम्ही आधी तिथे जाऊन आलेलो असल्यामुळे ते छान आहे हे तर माहित होतंच. तसंच तिथून लोणावळ्याकडे जायच्या रस्त्यावर "दुधिवरे" म्हणून एक छोटंसं गाव आहे, ते आणि सध्या पर्यावरणवाद्यांनी भयंकर गाजवलेलं "लवासा" अशी ठिकाणं नक्की झाली.

जे कोणी बाहेरून पुण्यात येतात, त्यांच्यात जर कोणी बायका असतील तर त्यांना आल्या आल्या तुळशीबागेत जायचे वेध लागतात. त्यात सध्या संक्रांतीच्या हळदीकुंकवाची धूम चालू असल्यामुळे लुटायच्या विविध वस्तूंनी तुळशीबाग अगदी बहरलेली आहे. त्यामुळे शनिवार हा तिथेच भटकण्यात गेला होता. साहजिकच रविवारी ही ट्रीप करायचं ठरलं.

रविवारी सकाळी ८ ला सुमारास आम्ही बाहेर पडलो. सासू-सासरे गाडी घेऊनच आलेले होते, त्यामुळे कसं जायचं हा प्रश्न नव्हताच. आधी हाडशीला जायचं म्हणून आम्ही पिरंगुट मार्गे मुळशीच्या रस्त्याला लागलो. पौड गावाच्या बसथांब्यावरून उजवीकडे वळलं की हाडशीला  जायचा रस्ता लागतो. थोडसं पुढे गेल्यावर डाव्या हाताला "महिंद्र क्लब रिसोर्ट" चा एक त्रिकोणी आकाराचा डोंगर दिसला. एकंदर दृश्य पाहून तिथे एकदा जायला हवं अशी मनाने नोंद करून ठेवली. तसंच त्याच रस्त्यावर "गिरीवन" म्हणून एक हॉलिडे रेसोर्ट आहे डोंगराच्या कुशीत. तेही खूप सुंदर आहे असं ऐकलं होतं. तिथेही जायचंय एकदा. पुढची ट्रीप मनात पक्की करतच आम्ही हाडशीला पोचलो. मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता थोडा खराब झाला होता, पण गाडी असल्यामुळे विशेष जाणवलं नाही.

मंदिराकडे जायचा रस्ता
मुख्य कमानीतून आत शिरल्यावर एकदम सगळा नूरच पालटून गेला. सुरेख वळणावळणाचा चढाचा रस्ता, दोन्ही बाजूला नारळ, आंबा अशी हिरवीगार गर्द झाडे, आणि एका बाजूला छान असं छोटंसं तळं. वा, दिल खुश हो गया. "आंब्याच्या बागेत जाऊ नये, व झाडांना हात लावू नये, अन्यथा ५०० रुपये दंड आकारण्यात येईल" अश्या आंब्याच्या झाडावर लावलेल्या खास पुणेरी शैलीतल्या पाट्या पाहून मनोरंजन पण झाले. ती छोटीशी घाटी चढून वर पोचलो. उत्तम पार्किंगची सोय होती. अपंग व वयोवृद्ध लोकांसाठी व्हीलचेअर आणि मंदिरात जाण्यासाठी  छोटीशी लिफ्ट याचीही सोय होती.

अरे हो, महत्वाचं सांगायचंच राहिलं, की हाडशीला नक्की आहे तरी काय. तर, तिथे एक विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, ज्याची प्रतिष्ठापना परमपूज्य सत्यसाईबाबा यांनी केली आहे. हे मंदिर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मेहुण्याने बांधले आहे, त्यांचं नाव श्री. जाधव. तसं २-३ वर्षांपूर्वीच मंदिर बांधून झालं होतं, पण सत्यसाई बाबांनीच मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करावी म्हणून २ वर्ष वाट पाहून मागच्या वर्षी कार्तिकी एकादशीला मंदिर खरया अर्थाने भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.
विठ्ठल रखुमाई मंदिर, हाडशी
सुंदर हसरा निसर्ग, चहूकडे हिरवीगार लॉन्स, २ पवनचक्क्या, कारंजी, त्यात व आजूबाजूच्या फुलांच्या ताटव्यात सोडलेले दिवे हे सगळं पाहून आपल्या येण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. आधी गणपती मंदिर आहे, तिथे श्री गणेशाचं दर्शन घेऊन आम्ही विठ्ठल मंदिरात गेलो. मंदिरात अतिशय शांतता आणि स्वच्छता आहे. सर्वत्र श्री. सत्यसाईबाबांची वचने, भजने आणि संदेश लिहिलेले फलक आहेत. काही फोटो आहेत उदघाटनाच्या कार्यक्रमाचे. सुंदर आखीव रेखीव अश्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. आपले हात आपसूकच जोडले जातात या सगळ्या वातावरणाने भारुन. प्रसन्न वाटलं तिथे. तसंच मंदिराच्या खाली एक ध्यान मंदिर आहे, तिथे भजन, प्रवचन इ. चालू असतं. मंदिराच्या मागे थोडंसं चालत गेलं की एक महालासारखी वास्तू दिसते. ते सत्यसाईबाबांचे निवासस्थान आहे. आजूबाजूला खोल  दरी आणि चित्र काढावं असं वाटेल इतकं छान दृश्य दिसतं.
लॉन आणि विश्रांतीस्थळ
सत्यसाईबाबा निवासस्थान
हे सगळं पाहिल्यावर मंत्रमुग्ध होऊन आणि देवाला नमस्कार करून सगळे खाली आलो. खाली एक कॅन्टीन आहे, जिथे पोहे, भेळ, भजी, चहा, कॉफी असे पदार्थ मिळतात. तिथे बसून पोहे, भेळ,कांदाभजी यावर ताव मारून गाडीत बसलो.

प्रतीपंढरपूर, दुधिवरे
आता जायचं होतं दुधिवरेला. वाटेत "तिकोणा" हा शिवाजी महाराजांचा किल्ला लागतो. अगदी किल्ल्याशेजारूनच रस्ता जातो. तिथेही एकदा जायला हवं. (असं करत करत या एकाच रस्त्यावरच्या ३ ठिकाणांची नोंद करून ठेवलेली आहे मी) दुधिवरेलाही विठ्ठल रखुमाई मंदिरच आहे. ते बाबामहाराज सातारकर यांनी स्थापन केलं आहे, पंढरपूर सारखंच मंदिर बांधलं आहे आणि मूर्तीही पंढरपूर सारख्याच आहेत. अगदी "प्रतीपंढरपूरच". छान, रेखीव अश्या काळ्या पत्थरामध्ये घडवलेल्या मूर्ती पाहिल्यावर अगदी भरून आलं. सगळे सात्विक भाव मनभर झाले, प्रसन्न वाटलं. तिथेही खाली मंत्र मंदिर आहे. समोर, श्री बाबामहाराज सातारकर यांचा संगमरवरी पुतळा आहे. आणि त्यासमोर मस्त विस्तीर्ण अशी बाग आहे.
इथे जवळपास खायला प्यायला काही मिळत नाही. :( त्यामुळे दर्शन झाल्यावर टंगळमंगळ न करता पुढच्या प्रवासाला निघालो.)

गेल्या काही दिवसांपासून "लवासा" वरच्या चर्चेला अगदी उत आला आहे ना? नेमका हाच विचार केला आम्ही पण. म्हणलं बघूया तरी नक्की हे प्रकरण आहे तरी काय ते. इतका वाद, चर्चा, कोर्टाच्या स्थगिती मुळे गाजणारं लवासा  पहायची एक उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे आमची गाडी लवासा कडे वळली. पिरंगुट मधून लवासा कडे एक रस्ता जातो. पिरंगुट चा रस्ता बघितला तर फारसा चांगला नाही, पण लवासा कडे एकदा वळलं की चकाचक रस्ते. (बारामतीकरांची कृपा, दुसरं काय?)तसं अंतर ३२ कि.मी. आहे पिरंगुट पासून. १५ एक कि.मी. झाले की टेमघर धरण लागतं मुठा नदीवर. धरणाची भिंत एका हाताला ठेवून एक घाट आहे. त्या घाटातली वळणं म्हणजे काय सांगू महाराजा... इतकी तीव्र वळणं आहेत ना, की कधी कधी घाबरायला होतं. पण आजूबाजूचा निसर्ग, मस्त उंच डोंगर आणि मध्ये धरणाचं पाणी, हे सगळं पाहून भीती नाहीशी होते आणि तिची जागा लवासाबद्दलच्या उत्सुकतेने घेतली जाते.
टेमघर जलाशय
धरण मागे पडलं आणि कणीस, पेरू विकायला बसलेली माणसं दिसली. अशा ठिकाणी थांबून काहीतरी घेतलं जातंच. २ स्वीट कॉर्न आणि ३-४ पेरू घेऊन परत गाडीत बसलो. लवासाची प्रवेशद्वाराची कमान आता दिसायला लागली होती. एकदम लक्षात आलं की हीच कमान फ्रेम मध्ये ठेवून आय बी एन लोकमत चा तो (आगाऊ) निखील वागळे लोकांच्या कागाळ्या करत असतो. (त्याने फार वात आणलाय!! टिव्ही पाहत असताना तो Channel मधे आला, की मी पटकन पुढचा लावते) कमानीतून आत गेल्यावर एकदम सगळा चकचकीतपणा जाणवला. दर १०० मीटर वर दिव्याचे खांब, खालची दरी पाहायला सज्जे, एक बाजूला डोंगरावर मोठ्ठी फुलपाखरं, गोगलगाय, लेडी बर्ड यांचे छोटेखानी मॉडेल्स, आणि त्यात सोडलेले दिवे. एकदम छान वाटत होत. मध्ये मध्ये छोट्या छोट्या बागा, त्यामध्ये व्यवस्थित कचरापेट्या ठेवलेल्या (आपल्या लोकाना कागद, प्लास्टिकच्या पिशव्या कुठेही रस्त्यात टाकायची सवय आहे, हे गृहीत धरून केलेली सोय). चढण उतरायला लागलो, तशी छपरं दिसायला लागली. एक वळण घेतलं आणि सगळे टुमदार बंगले एकदम दृष्टीपथात आले. हेच ते गाजलेले काही करोडचे बंगले.

एक छानसं हॉटेल एका टेकडीवर दिसलं. नाव होतं एकांत. ज्याला कुणाला निसर्गाच्या सान्निध्यात एकटं राहून आत्मपरीक्षण करायचं असेल, त्यांच्यासाठी उत्तम जागा. (मला अजून तरी ती गरज नाहीये वाटलेली, म्हणून-) आम्ही खालच्या बाजूला दिसणाऱ्या पुलाकडे जायला निघालो. वाटेल एक टपरी सारखं काहीतरी दिसलं आणि भूक लागल्याची घंटा वाजली डोक्यात. पण जरा फिरून मग खायचं असा सर्वानुमते निर्णय झाला.
समोर एकदम छान दृश्य दिसत होतं. पाणी, त्यावरचा टुमदार पूल आणि पुलाच्या दोन बाजूला पंपिंग स्टेशन्स.
लवासाला वेढणारे ७ डोंगर
पुलावरून समोर सात डोंगर आणि एका बाजूला धरणाचे पाणी यामध्ये वसलेलं लवासा, दिसायला तरी छान दिसत होतं. तिथे अजून थोडेफार बांधकाम चालू आहे. सगळं काम पूर्ण झालेलं नाहीये. त्यामुळे अजून फिनिश्ड वाटत नाही ते. थोडेफार फोटो काढले, एक चक्कर मारली, आणि खायला थांबलो. तिथे साधे साधे पदार्थ पण खूप महाग..  काय करणार, २-३ करोड च्या बंगल्यांच्या शहरात आलो होतो ना आम्ही, मग मोजले रुपडे. :(

परतीच्या प्रवासाला लागलो. येतानाचा उत्साह जाताना कमी झालेला असतोच. त्यामुळे सगळे शांत होते. मला मात्र एक कळत नव्हतं, एवढं छान शहर वसतंय, तर त्याला पर्यावरणवाद्यांचा एवढा कट्टर विरोध का? वृक्षतोड, डोंगर फोडणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धरणाच्या पाण्याचा वापर, यावरून वादंग उठणं साहजिक आहे. पण हे सगळं त्यांनी आधीच, म्हणजे जेव्हा हे काम सुरु झालं तेव्हाच करायला हवं होतं. जवळपास ९०% काम पूर्ण झाल्यावर, आता या इमारती पाडा, या म्हणण्याला काय अर्थ आहे? जो काही पर्यावरणाचा ऱ्हास व्हायचा तो तर आधीच झालाय ना, मग आता इमारती पडल्याने तो थोडाच भरून निघणार आहे?
कदाचित हा लवासावाल्यांचा पब्लिसिटी स्टंटही असू शकतो. कारण मी कुठेतरी ऐकलं, की लवासाच्या मार्केटिंग साठी जेवढा खर्च येणार होता त्याच्या १०% बजेटमध्येच इतकी जाहिरात झाली आहे आता, की लवासा पहायला येणारयांचा ओघ उत्सुकतेपोटी का होइना पण वाढतोच आहे. त्यामुळे, या शक्यतेला थोडासा तरी वाव आहेच. दुसरं असं की या प्रकरणात सगळ्या बड्या धेंडांचे हात अडकलेले असल्यामुळे, आपलं नागडेपण झाकण्यासाठी तेही उत्सुक असणारच. त्यामुळे बघूया आता ही मारामारी कुठेपर्यंत चालते ते.

असो, आमची ट्रीप तरी छान झाली. काय म्हणतात ते, ट्रीप अगदी "साठा उत्तरी सुफळ संपूर्ण" झाली... निसर्ग अगदी डोळे भरून पाहिला, देव देव केले, पुण्य गाठीला बांधले, आणि राजकारणामुळे प्रकाशझोतात आलेले लवासाही पाहिले. अजून काय हवं एका फटक्यात. नाही का? (तुम्हीही अशी एखादी ट्रिप करावी अणि मस्त भटकावं या उद्देशाने हो पोस्ट टाकलीय बरं का, तेव्हा जाउन आलात की सांगा मला)      



Read more...

चटका..

>> बुधवार, १९ जानेवारी, २०११

एक १० -१२ वर्षांची चिमुरडी. प्राण्यापक्षांची तिला खूप आवड. घरात एक गोजिरवाणे कुत्रे, एक छोटसं मांजराचं पिल्लू आणि सतत वटवट करणारा एक बोलका राघू. या सगळ्यांनी तिचं आयुष्य अगदी व्यापून टाकलेलं. हे मुके जीव तिच्या लहानश्या विश्वाचा अविभाज्य भाग होते. अशातच तिचा तो प्राणप्रिय मोत्या कुत्रा आजारी पडला. काही खाईना-पिईना, सतत मलूल असा पडून राहायचा. ती शाळेला जाताना तिच्या अंगावर उड्या मारून, "मला पण घेऊन चल" असे मुक्याने विनवणारा मोत्या तिला जाताना पाहून फक्त मान वर करून परत मरगळून झोपू लागला. हे सगळं जाणवून की काय, मोत्याला भयानक टरकून असणारं ते मनीमाऊचं पिल्लू देखील मोत्याच्या आसपास वावरून आपलं त्याच्यावर असणारं प्रेम व्यक्त करू लागलं. राघू ची सतत चालू असणारी वटवट फक्त " टीर्र! मोत्या उठ! टीर्र" एवढीच मर्यादित झाली. पण कसल्याश्या आजाराने थकलेला मोत्या या सगळ्या गोतावळ्याला सोडून गेलाच. त्याला जवळच असणाऱ्या प्राण्याच्या दफनभूमीत पुरण्यात आलं.

त्या एका दिवसाने त्या मुलीचं अवघं आयुष्यच बदलून गेलं. तिला जिथे तिथे मोत्याच दिसू लागला. वेड्यासारखंच काहीतरी करायला लागली ती. मोत्या मेला, हेच पटायला तयार नाही तिला. तिला वाटलं तो तिला सोडून गेला दूर कुठेतरी. आपली मनी आणि राघू पण आता आपल्याला सोडून जाणार या धास्तीने त्यांना सतत जवळ घेऊन बसू लागली. जेवताना, झोपताना सगळीकडे मनी आणि राघू. शाळेत जायला तयार होईना, का तर ती शाळेत गेल्यावर मनी आणि राघू तिला सोडून गेले तर?

घरचे लोक  थोडेसे धास्तावलेच. त्यांना आधी वाटलं होतं की काही दिवस ही असे करेल, पण एकदा शाळा, अभ्यास सुरु झाला, की विसरेल सगळं. पण कसलं काय, मोत्या जाऊन ३ महिने लोटले तरी तिचं हे सगळं चालूच होतं. तिच्या बाबांनी तिला नवा मोत्या आणूया असं सांगून समजावयाचा प्रयत्न केला, पण तिला काही केल्या तोच मोत्या हवा होता. आता मोठं कुत्रं तर आणू शकत नव्हते ते. ते बरं अचानक या सगळ्यांना आपलंसं करेल. त्याला सगळ्यांची सवय तर लागायला हवी. या विचाराने तिच्या बाबांनी अगदी तसंच दिसणारं त्याच जातीचं एक पिल्लू आणलं. तिने ते स्वीकारलं पण "तो मोत्याच", हे काही तिला पटलं नव्हतं. ती त्याच्यावर मोत्याइतकं प्रेम करायची नाही, त्याला दूर दूर करायची. त्याला दिलेली ताजी पोळी आणि दूध मनीला द्यायची. फक्त मनी आणि राघुशी प्रेमाने वागायची. कितीही नाही म्हणलं तरी प्राण्यांनाही कळतंच, कोण त्यांच्यावर प्रेम करतं आणि कोण नाही ते. त्या बिचाऱ्या पिल्लालाही जाणवलं की ही त्याचा राग राग करतेय, तिला आपण आवडत नाही. ते पण तिच्यापासून दूर पळू लागलं, ती येताना जरी दिसली तरी कर्कश्श ओरडू लागलं. तिला जवळपास देखील फिरकू देईना.

तशातच त्या मुलीला स्वप्नात देखील मोत्याच दिसू लागला. झोपेतून ओरडत उठायची, "मोत्या मला बोलावतोय, त्याला कुणीतरी खूप मारलंय,मी जाते त्याच्याकडे" असं म्हणून घरातून दाराच्या दिशेने चालू लागायची. घरच्यांना आता थोडी थोडी भीती वाटायला लागली. हिच्या मनावर काही परिणाम तर नाही ना झाला, या विचाराने त्यांचं डोकं गरगरायला लागलं. लवकरात लवकर एका चांगल्या मानसोपचार तज्ञांकडे जायचं असा विचार पक्का झाला.

एक दिवस सकाळी ती मुलगी उठली. कधी नव्हे ते छान आवरून, एकदम शांतपणे, शहाण्या मुलीसारखी जिना उतरून खाली आली, आणि वडिलांना म्हणाली, "बाबा, आपला मोत्या परत आलाय, बाहेर दारात आपल्या सगळ्यांची वाट पाहतोय, पण त्याला ना आपण आवडलो नाही, त्याने दुसऱ्या मालकांकडे रहायचं ठरवलयं. तर मी त्याला सोडून येते त्यांच्या कडे." घरचे संभ्रमात. बोलतेय तर शहाण्यासारखी, पण मोत्या बाहेर आलाय, म्हणजे काय? सगळे तिच्या मागून बाहेर गेले. अर्थातच बाहेर कुणी नव्हतं. अचानक  एका दिशेला बोट करून ती बोलायला लागली "तो पहा मोत्या, किती छान गब्बू झालाय ना आता. मीच त्याला कदाचित नीट खाऊ देत नसेन, म्हणून तो मला सोडून गेला. नव्या मालकांकडे त्याची तब्येत छान सुधारलीय, ते त्याच्यावर खूप प्रेम करतात."  तिच्या आईच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहायला लागले. आपली मुलगी अशी भान हरपून काल्पनिक जगात वावरतेय या जाणीवेने तिच्या आई-वडिलांच्या पोटात धस्स झालं.

ती बोलतच होती, "बाबा, त्याला त्याचं नवीन घर सापडत नाहीये, मी त्याच्याबरोबर जाऊन त्याला सोडून येते". तिच्या आईने काही बोलायच्या आत, ती जोरात धावत सुटली.

"मोत्या मोत्या, अरे थांब, किती जोरात पळतोस? मी पडेन ना! आपण शोधूया तुझं नवं घर, पण जाता जाता माझ्याशी खेळशील ना? तिथे गेल्यावर मला विसरू नकोस हा, मला भेटायला येत जा!!"

धप्प!!
इतका वेळ स्तिमित होऊन तिला पाहणारे सगळे, काहीतरी आवाज आला म्हणून एकदम संमोहन सुटावं तसे भानावर आले.  त्यांची मुलगी कुठेच दिसत नव्हती. अचानक तिच्या आजीच्या लक्षात आलं, मोत्याला पुरलेल्या प्राण्यांच्या दफनभूमीच्या पाठीमागे एक दलदल आहे आणि तिची नात काल्पनिक मोत्याच्या मागे धावत धावत त्याच दिशेने गेली आहे. आजी सर्व शक्ती एकवटून ओरडली, वाचवा रे तिला, ती तिकडे गेलीय.

पण.... ती परत कुणालाच दिसणार नव्हती, कारण जेव्हा तिचे घरचे तिथे पोचले तेव्हा एक हात दलदलीत रुतत रुतत नाहीसा होत होता!!!!...

पुन्हा कधीच न दिसण्यासाठी!!

.
आयुष्यभर झोंबत राहील असा चटका सगळ्यांना देऊन..





             

Read more...

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP