वळीव

>> शुक्रवार, १० जून, २०२२

 आपण भर दुपारी टळटळीत उन्हात प्रवासाला निघालो आहोत आणि तो फारच कंटाळवाणा चालू आहे. 
खरं तर आता सगळ्यांना वळीवाच्या पावसाची आस लागली आहे, पण त्याच्या आगमनाचं काही म्हणल्या काही चिन्ह नाही. आणि अशात एखाद्या बोगद्यातून गाडी बाहेर येते आणि डोंगराच्या पल्याड एक अभूतपूर्व दृश्य दिसतं..
आग ओकणाऱ्या त्या महाशक्तिमान सूर्याला एका मोठ्याशा शामरंगी ढगाने चक्क झाकून टाकलंय. आणि छान शामल सावली सगळीकडे पडली आहे. हवा एकदम कुंद आणि थंड झाली आहे, पक्षी किलबिलाट करत आपापल्या घरट्याच्या ओढीने परतू लागले आहेत. मातीचा कण न कण त्या एका अमृत बिंदूची
 आसुसून वाट बघतो आहे, आणि अशातच उघड्या खिडकीतून एक चुकार थेंब आपल्या चेहऱ्यावर पडतो. काया थरारून उठते आणि नजर वेध घेऊ लागते त्या सरसरणाऱ्या थंडगार सरींची. निळ्या सावळ्या गार गार अनुभूतीची..
मनात एक कल्पना आकार घेऊ लागते, शब्द जुळू लागतात व एक अलवार रचना त्या टपटपणाऱ्या मोत्यांच्या लडीसम उलगडत जाते, काहीशी अशीच...


शाम सावळ्या मेघांत तू,
भ्रमराच्या गुंजारवात तू,
गोपालांच्या अलगुजात तू,
तुझेच सूर मनात आळवतो आहे।

ओलेत्या पानांत तू,
बरसणाऱ्या धारांत तू,
ओल्या मातीच्या गंधात तू,
भिजल्या रंध्रातून तुला अनुभवतो आहे।

सोसाट्याच्या वाऱ्यात तू,
कडाडणाऱ्या विजांत तू,
वर्षावणाऱ्या गारांत तू,
आठवणींचे कण कण वेचतो आहे।

असं वाटतं की एकदम झाकोळून यावं,
आणि पाऊस बरसून गेल्यावर
लख्ख उन्ह पडावं, 
त्या चमकत्या प्रकाशावर स्वार होऊन तुझ्यापाशी यावं
आणि मनातलं गुज अलगद तुझ्या मनी रुजवावं।

या मनीचे त्या मनाला
उमगेल सारे काही
निःशब्द तू अन निस्तब्ध मी,
एकरूप होऊन जावे।

होळीच्या खूप खूप शुभेच्छा!

>> बुधवार, ७ मार्च, २०१२



कुठल्यातरी सणाचं निमित्त साधल्याशिवाय मी काही चार ओळी लिहायचा प्रयत्न करत नाही. होळी हा माझा आवडता सण, कारण होळी आणि पुरणपोळीचं समीकरण डोक्यात अगदी पक्कं बसलेलं. आणि पुरणपोळी म्हणजे जीव की प्राण. त्यामुळे होळी दिवशी कविता सुचणार असं वाटत होतंच मला.आता हिला कविता म्हणणं म्हणजे विनोदच.पहा बरं ठीक ठाक जमलीय का ते-

शिशिराच्या पानगळीला,
निरोप द्यायची वेळ झाली!
वसंताच्या नव्या धुमार्यांना,
सवें घेऊन होळी आली!

घरोघरी दरवळले,
पुरणपोळीचे सुगंध!
टिमक्यांच्या नादामुळे,
वातावरण झाले धुंद!

दुष्ट प्रवृत्तींना आळा घालून,
होळीत त्यांचे दहन करू!
होलीकामातेची पूजा करून,
चैत्रमासाचे स्वागत करू!

नवनवीन रंगांनी भरो तुमचे आभाळ,
हीच मनी सदिच्छा!
सर्व मित्र मैत्रिणींना,
होळीच्या खूप खूप शुभेच्छा!

पहिल्यांदाच...

>> मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०११



कुठलाही सण जवळ यायला लागतो तसे त्याचे संकेत फेसबुक, जीमेल वर स्टेटस अपडेट्स च्या रुपात झळकायला लागतात. कुठला तरी सुविचार, मराठी गाण्याच्या ओळी, कविता अश्या विविध रुपात प्रत्येक जण आपला आनंद व्यक्त करत असतो. मी ही करते. दर वर्षी एखाद्या कवितेतल्या ओळी घ्यायच्या आणि लावायच्या स्टेटस मेसेज म्हणून, ही नेहमीची सवय. या वर्षी म्हणलं, बघू तरी आपल्याला चार ओळी तरी स्वत: करता येतात का ते.. आणि चक्क १० मि.त जमल्या पण. चार ओळी नाही तर चांगली ३ कडवी.. कशी झालीय माहित नाही, पण म्हणलं पहिलावहिला प्रयत्न आहे, छापून तरी बघू.. पहा तुम्हाला कशी वाटते ते..

धन पूजिता त्रयोदशीला,
उदंड लक्ष्मी व्यापाऱ्याला.
श्रीकृष्णाने वधिला हो,
नरकासुर तो चतुर्दशीला.

अवसेला लक्ष्मीचे पूजन करता,
मंगलमय हो परिसर झाला,
पाडवा येई वाजतगाजत,
साक्षी पती-पत्नी प्रेमाला.

भाऊ-बहिणीचे नाते हळवे,
सुखावून जाते भाऊबीजेला,
अशी दिवाळी साजरी होता,
सौख्य लाभे घराघराला..

-----केतकी 



अकस्मात होणार होऊनी जाते..

>> बुधवार, १८ मे, २०११


अचानक, नकळत, अकस्मात या शब्दांना आपल्या सारख्या पामरांच्या लेखी किती महत्व आहे, हे वेळ आल्याशिवाय कळत नाही हेच खरे..

काल बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे आम्हाला सुट्टी होती. त्यात मंगळवार म्हणजे आठवड्याचा मधला वार.. अश्या दिवशी सुट्टी मिळाल्याचा आनंद वेगळाच.. सकाळी नेहमीसारखी उठले तेव्हाच ठरवलं होतं की आज सगळी पेंडिंग कामं संपवून टाकायची. आराम करायचा. बाहेर खायचं. त्यामुळे खुशीत होते. पण... देव पण असा आहे ना, एखाद्याला सुखी करतो तेव्हा दुसऱ्या एखाद्यावर त्याने दुखा:चे डोंगर कोसळवायचं ठरवलेलं असतं.

मला कुठे माहित होतं की आजचा दिवस माझ्यासाठी कसा ठरणार आहे ते. सकाळी सगळं आवरून बाहेर पडले ठरवलेली कामं उरकायला, आणि इतक्यात फोन वाजला. मी गाडी चालवताना शक्यतो फोन घेत नाही, पण काल का कुणास ठाऊक घ्यावासा वाटला.
फोनवर नाव होतं माझ्या कंपनीतल्या मैत्रिणीचं. "आज, सुट्टीदिवशी का बरं आला असेल हिचा फोन"  असा विचार करताच फोन घेतला, आणि तिनं सांगितलेल्या बातमीनं अक्षरश: सुन्न झाले. डोकं पूर्ण बधीर.. काय सांगतेय तेच कळेना झालं मला.
"सुंदराजन सर एक्स्पायर झाले?" काय बोलतेय ही.. मी जोरात किंचाळले "काय?
अगं शुक्रवारी तर दिसले होते मला, हसले पण माझ्याकडे बघून, आणि तू काय सांगतेस ते गेले म्हणून..."
तिचीही तीच अवस्था होती, तेवढ्या त्या ५ मिनिटात ३ जणींचे मला फोन आले, पण कुणाचाच नीट विश्वास बसत नव्हता यावर..दुर्दैवानं बातमी खरी होती.

"डॉ. व्ही. सुंदराजन"  आमच्या कंपनीतले एक प्रसिध्द व्यक्तिमत्व. शांत, मितभाषी, सर्वांशी प्रेमाने वागणारे, आपला समोरच्याशी काहीही संबंध नसला, तरी तितक्याच आपुलकीने त्याला हवी ती मदत करणारे, एखाद्या बाबतीत योग्य ती दिशा दाखवणारे, सर्वांचे हितचिंतक आणि "Human resource" टीम सर्वेसर्वा असे सुंदराजन सर आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच कशीतरी वाटली. कितीतरी PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत. MS करणाऱ्या लोकांचे "प्रोजेक्ट गाईड" म्हणून By Default  सरांचं नाव पुढे येत असे. हे सगळे लोक काय करतील आता? ते ज्या टीमचे प्रमुख होते, त्या सर्वाना ती रिकामी खुर्ची बघून काय वाटेल रोज?

माझा त्यांच्याशी प्रत्यक्ष असा संबंध नव्हता, म्हणजे मी त्यांच्या बरोबर कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये काम करत नव्हते, की ते माझे गाईड पण नव्हते. पण कुठलीही गोष्ट बरोबर होत नाहीये आपल्या बाबतीत, असं जरा जरी वाटलं की त्यांच्याकडे धाव घ्यायचो आम्ही. आणि तेही काहीतरी सल्ला, एखादा उपाय, किंवा वरच्या लोकांशी बोलून काहीतरी करण्याचं आश्वासन दिल्याशिवाय कधीच विन्मुख पाठवायचे नाहीत कुणालाच. HR चेच प्रमुख असल्यामुळे आम्ही त्यांना कधीही कुठेही गाठायचो, पण ते न चिडता, न वैतागता, हसऱ्या चेहेऱ्याने आम्हाला उत्तर द्यायचे.
आता कुणाकडे जायचं आम्ही?

ते मूळचे चेन्नईचे. पण बऱ्याच वर्षांपासून पुण्यात स्थायिक झालेले. घरी पत्नी, आणि २ मुले. मोठी मुलगी १२ वीत आणि मुलगा १० वीत. पहिल्यांदा त्यांचेच चेहेरे आले डोळ्यासमोर. काय अवस्था झाली असेल त्यांची..

सकाळी ८. किती प्रसन्न वेळ. दिवसाची सुरुवात. अश्या वेळी देवाला एखाद्याच्या आयुष्याचा शेवट करावा असं का वाटलं असेल? बास.. छातीत एक जोरदार कळ, आणि रुग्णवाहिका बोलावेपर्यंत खेळ खलास?? कुठलीही हृदयरोगाची तक्रार नसणाऱ्या, नियमित योगा करून स्वत:ला तंदुरुस्त ठेवणाऱ्या, नेमाने पूजा अर्चा करणाऱ्या आणि कुणाचं कधी वाईट न चिंतणाऱ्या या माणसाबद्दल देवानं असा न्याय करावा?

आपल्या आसपास कितीतरी वाईट कृत्य करणारे, दुसऱ्याला पाण्यात पाहणारे, स्वत:च्या सख्या नातेवाईकांशी सावत्र वागणूक करणारे आणि सर्रास खून, दरोडे पडणारे दुरात्मे असताना एका चांगल्या माणसाला जेव्हा असा मृत्यू येतो, तेव्हा देवावर तरी कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न पडतो.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, आणि त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करून त्यातून लवकर बाहेर पडून कणखर बनण्याची शक्ती देवो, हीच त्या परमात्म्याकडे प्रार्थना...

पण एक मात्र खरं, आम्हाला तुमची खूप आठवण येत राहील सर.... 

 
 

गो गोवा..भाग ३

>> शुक्रवार, १५ एप्रिल, २०११

भाग १ इथे वाचा..
सकाळी आम्हाला ३ नवीन भिडू जॉईन होणार होते, माझ्या २ नणंदा आणि एक दीर. त्यांना ६ वाजता मडगाव स्टेशन वर आणायला गेलो. समुद्रकिनाऱ्यावरच्या गावात पहाटे पण हवा गरमच असते. भयंकर उकडत होतं. त्या तिघांना घेऊन परत हॉटेलवर आलो. आता कुणी झोपणं शक्यच नव्हतं. चहा कॉफी झाली. आणि लगेच बीच वर जायचं ठरलं. ७ च वाजले होते. आणि अजिबात गर्दी दिसत नव्हती. कॅमेरे सज्ज करून बीच वर गेलो. गेल्या गेल्याच स्टार फिश आणि उलटे पडलेले खेकडे दिसले किनाऱ्यावर. स्टार फिश मी पहिल्यांदाच पाहात होते, म्हणजे पुस्तकात पाहिलंय पण प्रत्यक्षात पहिल्यांदाच. त्यामुळे फोटो काढणं ओघानं आलंच. 
 तिथेच चप्पल काढून आम्ही शिरलो पाण्यात. अहाहा. कितीही वेळा समुद्रात खेळलं तरी प्रत्येक वेळी मस्तच वाटतं. खूप खेळलो, खूप फोटो काढले.
साधारण ९ वाजता, "वॉटर स्पोर्ट्स" वाले लोक यायला लागले. आम्हाला स्पीडबोट राईड करायचीच होती. पहिल्यांदा जे दोघेजण गेले, त्यांचा अनुभव ऐकल्यावर थोडीशी भीती वाटली, पण उत्सुकताही वाढली. मी आणि माझी नणंद बसलो. आणि पहिल्याच लाटेवर ती बोट जी काही उचलली गेली की बस.. तिथून खाली आलो तर दुसरी लाट खूप मोठी आली. तोंडावर आपटली सप्पकन.. आम्ही किंचाळायला लागलो. त्यानंतर त्या चालवणाऱ्याने बोट एकदम शार्प टर्न घेऊन वळवली. बापरे. कसलं टेन्शन आलं माहितीय.. त्यात मला पोहायला पण येत नाही. जाम टरकले होते. आम्ही घाबरलोय हे समजल्यावर त्या माणसाला चेव आला, त्याने अजून २-३ वेळा वळवली. आणि शेवटी किनार्याला आणली. उतरले तरी पाण्यात हलतोय आपण, असं वाटत होतं कितीतरी वेळ. पण झक्कास अनुभव होता तो. उतरल्यावर वाटलं का घाबरलो आपण एवढं..
बांगडा 

तितक्यात काही कोळी जाळ्यात मासे घेऊन येताना दिसले. पाण्यात धुण्यासाठी. आणि दिल चाहता हैं मधला अमीर खान चा सीन आठवला. तोंडात मासा टाकण्याचा. फोटो साठी तसं करून बघायला काय हरकत आहे, म्हणून त्याला विचारलं, तर एका फोटोसाठी ५० रुपये म्हणाला. बेत कॅन्सल... अहो अजून थोडे पैसे घातले की खायला मिळेल मासा...
 
पॅराग्लायडींग पण करायचं होतं, पण ते लोक अजून आलेच नव्हते. आणि आम्हाला बीच वर येऊन जवळजवळ ४ तास झाले होते. अजून बरंच काही पाहायचं होतं गोव्यात. त्यामुळे आटोपतं घेतलं. हॉटेल वर गेलो, तर स्विमिंग पूल मध्ये काही लोक पोहत होते. आता एवीतेवी ओले झालोच आहोत, तर तिथेही डुंबू, म्हणून त्यात उतरलो. आमचं ८ जणांचं टोळकं उतरलेलं बघून, जे काही ३-४ फॉरेनर्स होते पूल मध्ये, सगळे पळाले. पोहायला येणारे मस्त पोहत होते, मी आपली कडेकडेने चालत होते पाण्यात. ५ फुटात बाकीचे कसे काय पोहत होते काय माहित. जरा अर्धा तास पोहलो असू, तेवढ्यात मॅनेजर सांगत आला, स्विमिंग सूट शिवाय पोहू नका म्हणून. आलो सगळ्याजणी बाहेर. तशीही वेळ झालीच होती आवरायची. आणि हॉटेलचा काँप्लिमेंटरी ब्रेकफास्ट पण चुकवायचा नव्हता. त्यामुळे सगळेच बाहेर आले. अंघोळी वगैरे करून उप्पीट, टोस्ट बटर जॅम, ऑम्लेट, चहा यावर ताव मारला आणि गोवा भटकायला बाहेर पडलो.

आधी देवदर्शन करून मग आम्ही बीच पाहणार होतो. आधी शांतादुर्गा मंदिरात गेलो. 
शांतादुर्गा, मंगेशी  
गोव्यातल्या मंदिरांचं एक वैशिष्ठ्य आहे, ते म्हणजे प्रत्येक देवळासमोरचं छान बांधीव तळं. शांतादुर्गा मंदिरासमोरचं तळं अतिशय स्वच्छ आहे. मंदिरही खूप सुंदर आहे. दीपमाळ, प्रमुख मंदिर आणि आजूबाजूची छोटी मंदिरं मिळून मंदिराचा परिसर बनलेला आहे. मूर्तीही अतिशय तेजस्वी. देवीला नमस्कार करून आम्ही बाहेर आलो. त्या ठिकाणी फोटो काढण्याचा मोह होणार नाही, असं होऊच शकत नाही.
 
तिथून मंगेशी मंदिरात गेलो. पार्किंग पासून मंदिरात जाण्यासाठी थोडं चालावं लागतं. पण हे चालणं आजूबाजूला असलेल्या छोट्या दुकानांमुळे लक्षातपण आलं नाही. खास गोवा ज्वेलरी विकणाऱ्या त्या दुकानात चुटपूट खरेदी तर झालीच. काचेची कानातली, खड्यांच्या माळा, ब्रेसलेट्स इ. खरेदी करत करत आम्ही मंदिरात कधी पोचलो कळलंच नाही. हे ही देऊळ खूप छान आहे. दर्शन घेऊन इथेही थोडे फोटो काढले.

आता सगळ्यांना भूक लागली होती. (प्रत्येक मंदिरात जाण्यासाठी चालायचे कष्ट झाले होते न सगळ्यांना.) आमच्यापैकी आधी गोव्याला जाऊन आलेल्यांनी मिरामार बीच जवळचं "मिरामार रेसिडन्सी" हे हॉटेल सुचवल्यामुळे, आम्ही मिरामार बीच कडे वळलो. इथे परत फिश फ्राय, गोवन करी झालीच. जेवण झाल्यावर मिरामार बीच कडे जाणार इतक्यात कोणीतरी म्हणलं, उन्ह खूप आहे, आपण बीच स्किप करू, बीच सारखा तर बीच.. :) आधीच सगळे फार उत्साहात, त्यामुळे बीच कडे वळलेली पाउलं लगेच मागे वळली. मग गेलो कलंगुट बीचला. पण तिथे एवढी भाऊगर्दी होती, की बस.. पाण्याकडे जायची सुद्धा इच्छा झाली नाही. बागा बीच लाही तेच.. फक्त बरोबरच्या लग्नाळलेल्या मंडळींना हिरवा (आणि गोरा पण) निसर्ग तेवढा पाहायला मिळाला इथे. . ६ वाजत आलेलेच होते, त्यामुळे गेलो परत हॉटेल वर. "बॅसिलिका ऑफ बॉम जिझस" हे चर्च पाहायचं होतं मला, कारण इथे सेंट झेविअर चे अवशेष जपून ठेवलेले आहेत. या चर्चचं बांधकाम जुन्या काळातल्या बरोक शैलीचं आहे. तसंच दोनापाउला बीच वरही जायचं होतं, पण बाकीच्यांना काहीच इंटरेस्ट नसल्यामुळे तिथे गेलो नाही. नेक्स्ट टाईम..

रात्री त्या अन्टोनिओच्या शॅकवर जायचं ठरलं होतंच. पण हॉटेलचं मागचं दार बंद झालेलं होतं, त्यामुळे हॉटेलपासून साधारण ५००मि. वर असलेल्या एका खोपच्यातून आम्ही किनाऱ्यावर उतरलो. रात्रीच्या वेळी मिट्ट अंधारात सांडलेल्या चांदणचुऱ्यात चालताना मस्त वाटत होतं. अधून मधून विजा होत होत्या. आम्ही त्या शॅकवर पोचलो आणि तिथला फ्युज गेला. म्हणलं ठीकाय, कॅण्डल लाईट मध्ये डिनर करू आज. ऑर्डर वगैरे दिली. आता बारीक पाउस चालू झाला होता. बीच वरच्या वाळूतल्या टेबलांवर बसलेले  फॉरेनर्स पळत आत आले. माझ्या डोक्यात चक्र सुरु झालं की आता हॉटेल वर भिजत जायला लागणार. सगळ्यांनी वेड्यात काढलं मला, शांतपणे जेवायचं सोडून कसले विचार करत बसतेस म्हणून. पण समुद्रकाठच्या पावसाबद्दल ऐकून होते मी. बघता बघता भयानक रूप धारण करतो हा पाउस. आणि तसंच झालं. आमच्या ऑर्डर मधलं सूप यायच्या आधीच धुवांधार पावसाला सुरुवात झाली. जोराचा वारा सुटला. इतका की मला वाटल आता शॅकवरचं छप्पर जातंय उडून. मेणबत्त्या विझून गेल्या होत्या कधीच.लाईट चा पत्ता नाही. विजा कडाडायला लागल्या. माझा २ वर्षाचा भाचा घाबरला त्या आवाजाने, तो रडायला लागला. खूप थंडी वाजायला लागली. दूर कुठेतरी वीज पण पडली असावी, कारण खूप जोरात आवाज येत होते अधून मधून. ते यडे  फॉरेनर्स मात्र खुशीत होते, कधी पाउस न बघितल्यासारखे टाळ्या बिळ्या देत सुटले होते. इकडे भाच्याचा सूर चढायला लागला होता. शेवटी ऑर्डर कॅन्सल करून हॉटेलवर जायचं ठरवलं. पण जाणार कसं. दार तर बंद. आमच्यातल्या दोघांनी कसंबसं पळत जाऊन वॉचमनला बोलावून विचारलं दार उघडण्याबद्दल, तो तयारच नाही. शेवटी कशीतरी समजूत घालून, मॅनेजरला मस्का लावून ते दार उघडलं आणि आम्ही जे काही धूम पळालो की सांगता सोय नाही. हा अनुभव मात्र कधीही न घेतलेला होता. खोलीत पोचल्यावर हुश्श झालं अगदी. काहीतरी नूडल्स वगैरे मागवले खोलीतच आणि खाऊन झोपून टाकलं.

दुसरे दिवशी निघायचं होतं परतीच्या प्रवासाला. ३ दिवस खूप मजा झाली होती आणि परत बॅक टू रुटीन जायला खूप कंटाळा आला होता. पण काम कुणाला चुकलंय का..
निघताना मात्र मनात म्हणावंसं वाटलं , मी परत येईन तुझ्या भेटीला, नव्या उत्साहाने.. तोपर्यंत "I miss you Goa..."    

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP