वाळलेल्या पानांचा "सुबक" संग्रह- हर्बेरीअम

>> सोमवार, ६ डिसेंबर, २०१०

सध्याचे हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट/नाटकं यांची जर कुणी तुलना करायची ठरवलीच, तर कोण श्रेष्ठ ठरेल हे काही मी वेगळं सांगायची गरज नाही. अहो काय ते हिंदी चित्रपट. काही शेंडा बुडखा नसलेली पटकथा, दे मार हाणामारी, प्रेमात पागल झालेले आणि कैच्या कै उद्योग करणारे नायक-नायिका किंवा मग एकदम काळ्या निळ्या कपड्यातले, स्वच्छ प्रकाशापेक्षा अंधारात जास्त सरावाने वावरणारे आणि खूप तत्वज्ञान झाडणारे लोक.  कसे बघायचे सांगा हे चित्रपट.. असो.

पहिल्यापासून मला चित्रपटांपेक्षा नाटकंच जास्त आवडतात. अगदी संगीत नाटकं पण मी आवडीने पाहते. त्यात पुण्यात असल्यामुळे नवीन नवीन आणि कसलेल्या नटवर्यांची नाटकं लागली बालगंधर्व किंवा यशवंतरावला (यशवंतराव चव्हाण नाट्यगृह) की मी शक्यतो सोडत नाही. अशीच काही महिन्यांपूर्वी एक बातमी वाचली होती. "१९६०-७० च्या काळातली गाजलेली मराठी नाटकं परत रंगभूमीवर आणण्याचं महत्वाचं काम "सुबक-सुनील बर्वे कलामंच" तर्फे हाती घेतलं आहे आणि त्या मालिकेतील पाहिलं नाटक "सूर्याची पिल्ले" याचे फक्त २५ प्रयोग महाराष्ट्रभर होणार आहेत." त्याच वेळी हे नाटक पाहायचं ठरवलं. पण नंतर कळलं की मुंबईत १३ आणि पुणे, कोल्हापूर, नाशिक अश्या इतर शहरांत मिळून उरलेले १२ प्रयोग असणार आहेत. आणि माझ्या दुर्दैवाने जे काही प्रयोग पुण्यात झाले, त्याला जायचा योग आला नाही.

काही दिवसांपूर्वी वाचलं की "सुबक" ची निर्मिती असलेले बाळ कोल्हटकर यांच्या "लहानपण देगा देवा" या सुखांती नाटकाचे २५ प्रयोग  "हर्बेरीअम"  सादर करणार आहे. घराच्या जाणत्या लोकांना, ज्यांनी त्यांच्या काळात खुद्द बाळ कोल्हटकर यांनी केलेलं हे नाटक पाहिलेलं आहे, त्यांना विचारल्यावर हे नाटक पाहायचा निर्णय अगदी पक्का केला.

"हर्बेरीअम" म्हणजे जुन्या वाळलेल्या पानांचा कुशलतेने केलेला संग्रह. या संग्रहातल्या या दुसऱ्या पानाचा पुण्यातला पहिला शुभारंभी प्रयोग बालगंधर्व ला होणार हे कळल्याबरोबर तिकीट काढून आले. या नाटकांची तिकिटे थोडी जास्त आहेत. पहिल्या १० की १२ रांगांचे तिकीट आहे ३०० रुपये. पण नाटकातले कलाकारच एवढे कसलेले आहेत, की मी विचार केला नाही जास्त. आणि तसंही चित्रपट जसा बाल्कनीतून पाहायला जास्त मजा येते, तसं नाटक हे शक्य तितक्या पुढच्या रांगेत बसून पाहिल्यानं त्याची लज्जत वाढते.

तर अश्या या नाटकाची गोष्ट इथे थोडक्यात सांगते.

अनंत उत्पात (जरा वेगळच आहे ना नाव?) नावाच एक माणूस आफ्रिकेहून बऱ्याच वर्षांनी अचानक आपल्या मुंबईला आपल्या बहिणीच्या घरी टपकतो आणि तिथेच तळ टाकतो. आणि चाळीतल्या सगळ्यांकडून मेव्हण्याच्या नावाने उधारी घेऊन सगळ्यांना बेजार करतो. हे सगळे लोक स्वत:ची खोटी प्रतिष्ठा जपण्याच्या नादात दुसऱ्यांना उधारी देऊन कर्जबाजारी झालेले आहेत. पण आपली अब्रू जाईल म्हणून कोणीच तसं  दाखवत नाहीत.

बहिणीच्या घरात तिची लग्नाला आलेली एक नणंद-शरयू आहे. ती पडलीय तिला गाणं शिकवायला येणारयाच्या-राजूच्या प्रेमात. पण त्या मुलाच्या बापाला हे लग्न मान्य नाही, का तर यांचं घराणं त्याच्या तोलामोलाचं नाही.तो बाप ही अफरातफरीच्या भानगडीत अडकलेला..

बहिणीचा नवरा-विसूभाऊ अतिशय भोळा भाबडा आणि बिच्चारा आहे. त्याचं एक दुकान आहे पण ते चालत नाही. पण हे वडिलांना कळू नये म्हणून प्रत्येक पत्रात दुकान उत्तम चाललंय असं कळवतो. दुकानासाठी घेतलेलं कर्ज फेडलं जात नाहीये, त्यामुळे कधीही दुकानावर बँकेची टाच येऊ शकते अशी परिस्थिती.

बहिणीचे सासरे-अप्पा,  गावाकडे असतात. त्यांचीही हीच गत आहे. प्रतिष्ठितपणाच्या हव्यासापायी राहतं घर गहाण पडलं आहे. पण हे मुलाला कळू नये म्हणून सगळं  कसं छानछोकीत  चालू आहे असं भासवतायत. 
या त्या कारणावरून सुनेला "तुमचं घराणंच तसलं" असे टोचून बोलणाऱ्या अप्पांना अनंता हा तिचाच भाऊ आहे हे माहित नाही, माहित करून दिलेलं नाही, कारण याने त्यांना पण त्यांच्या गावी जाऊन गंडा घातलाय आणि हे जर त्यांना कळलं तर ते दुकानात घातलेलं भांडवल काढून घेतील ही विसूभाऊना भीती आहे.

तर अशी हि सगळी गोलमाल अनंताच्या लक्षात आलीय. आणि त्या गोंधळात तो अजून भर टाकतोय नवे नवे उद्योग करून.

भाऊबिजेसाठी  आलेला अनंत उत्पात बहिणीला भाऊबीज घालतो की तिच्या गोंधळात अजून भर टाकून आफ्रिकेला निघून जातो, हे नाटकात प्रत्यक्ष पाहण्यात खरी मजा आहे. ते मी सांगत नाही. तुम्हीच पहा नाटक प्रत्यक्ष आणि आनंद घ्या.

पात्रपरिचय:
विश्वनाथराव-मंगेश कदम 
बहिण- शिल्पा तुळसकर
शरयू-स्पृहा जोशी
राजू-सचिन सुरेश
अप्पा-जयंत सावरकर
आणि
अनंत उत्पात- शरद पोंक्षे


नाटकात काम करणारे सगळेच कलाकार अतिशय कसलेले अभिनेते आहेत, त्यामुळे खरी बहार येते नाटक पाहताना. विशेषत: शरद पोंक्षे-.. अतिशय सुरेख आणि संयत अभिनय केलाय त्यांनी. मंगेश कदम यांचे काम ही सुंदर झालेय, भोळा भाबडा विसुभाऊ त्यांनी झकास उभा केलाय. दिग्दर्शन हि त्यांचंच आहे. स्पृहा जोशी या नव्या अभिनेत्रीने भूमिकेचं सोनं केलंय. (म्हणजे अग्निहोत्र मधली उमा बंड- हे काम तर तिने फारच छान केलं होतं).
एकूण काय तर तिकिटाच्या रकमेची पर्वा न करता हे नाटक जरूर जरूर पहा. तुम्हाला अजिबात पश्चात्ताप होणार नाही...

4 comments:

अनिकेत ७ डिसेंबर, २०१० रोजी १०:११ PM  

मजेदार वाटते आहे, योग जुळुन आला तर म्हणजे सुट्टीच्या दिवशी नाटकाचा प्रयोग असेल आणि मॅनेजरने मेहेरबानी करुन शनि-रवि काम काढलेले नसले तर जरुर पाहीन

धन्यवाद
अनिकेत
http://manatale.wordpress.com

Ketaki Abhyankar ८ डिसेंबर, २०१० रोजी १०:३७ AM  

@ अनिकेत: येत्या शनिवारी म्हणजे ११ डिसेंबर ला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आहे याचा प्रयोग. रात्री ९.३० की १० कधीतरी आहे.

Anant S. Dhavale ११ डिसेंबर, २०१० रोजी १०:११ PM  

changala blog...

Spruha २२ डिसेंबर, २०१० रोजी ११:११ PM  

ketaki khoop khoop aabhar!!

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP