एक उनाड दिवस

>> शुक्रवार, ३ डिसेंबर, २०१०

दिवस: आठवड्यातला कुठलाही एक (शनिवार रविवार सोडून)
वेळ: भर दुपारी १२ ची
ठिकाण: माझी अत्यंत आवडती वेळ घालवण्याची जागा , तुळशीबाग  :)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्ष संपत आलं आहे. कंपनीने  दिलेल्या ८ आजारी सुट्ट्या (sick  leave) संपवण्याची वेळ आलेली आहे. उरलेल्या दिवसांमध्ये २ सार्वजनिक सुट्ट्या पण येणार आहेत. तेव्हा राहिलेली एक रजा जर मधल्या एखाद्या दिवशी , म्हणजे शनिवार रविवार ला न जोडता घेतली तर? असा विचार येण्याचे कारण एकच. तो एक दिवस हा पूर्णपणे तुमचा असतो, आणि तुम्हाला हवा तसा वापरता येतो. ज्या लोकांच मूळ गाव वेगळं आहे, आणि ५-६ तासांच्या अंतरात आहे, त्यांना माझ्या म्हणण्याचा अर्थ लक्षात येईल. त्यांना बऱ्याच वेळेला शनिवार रविवार ला जोडून रजा घेऊन घरी जावं लागतं, काहीतरी कार्यक्रम असतात, किंवा घरचे  बोलावत असतात म्हणून. मग अश्या वेळी स्वत:साठी , घरासाठी करण्यासारखी जी काही कामे असतात त्याला फाटा द्यावा लागतो. तुम्हाला हवा तसा दिवस घालवता येत नाही. कधी कधी आठवड्यातल्या त्याच त्याच दिनक्रमाचा कंटाळा आलेला असतो. मग अश्या वेळी एक सुट्टी अशी कामाच्या दिवशी मिळाली तर किती फ्रेश झाल्या सारखं वाटतं.

हाच विचार करून माझी राहिलेली आणि याच वर्षात संपवायची अशी एक सुट्टी मी घ्यायची ठरवली. नवऱ्याने विचारले, करणार काय आहेस अशी मधल्या दिवशी सुट्टी घेऊन? मी म्हणलं "उनाडक्या". खरंच, मी काहीही ठरवलं नव्हतं काय करायचं ते. 

अशी मध्ये अधे सुट्टी घेण्याची वेळ आली तर मी सहसा बुधवार पसंत करते. एक तर २ दिवस काम करून १ दिवस सुट्टी मस्त वाटते, आणि दुसरं म्हणजे परत २ दिवस काम केल की शनी-रवी आहेतच. त्यामुळे मी त्या बुधवारी अचानक आजारी पडले. (ते कंपनीत सांगण्यापुरत) खरं तर मला सकाळी उशिरा उठायचं होत, पण अहो ऑफिस ला जाणार म्हणजे काही चान्स नव्हता. पटपट त्याला नाश्ता, डबा देऊन ऑफिस ला पाठवलं. :) आणि मग आवरायला लागले.

साधारण ११ वाजता ३-४ पिशव्या आणि पर्स भरून बाहेर पडले हिंडायला. समस्त स्त्रीवर्गाचं  टाईमपास करण्याचं पुण्यातलं आवडतं ठिकाण म्हणजे तुळशीबाग आणि लक्ष्मी रोड.  (पु.ल. नी म्हणलेले आहेच नाहीतरी, की पुण्यातील लक्ष्मी रोड आणि मुंबईतील रानडे रोड इथे जगातलं काय मिळत नाही!! रानडे रोड झालाय थोडाफार एक्स्प्लोर करून, मागे मुंबईत होते तेव्हा) आधी तुळशीबागेत शिरले. उगाच jeans वरचे tops  पहा, ड्रेस मटेरीअल पहा अश्या टिवल्या बावल्या केल्या. विंडो शॉपिंग करायला आवडतं आपल्याला. मग चप्पल stall समोर रेंगाळले. २-३ दुकानं फिरल्यावर आपण काहीच घेतलं नाहीये अजून याची लाज वाटून एक चप्पल  घेतली(अर्थात चप्पल जोड). 

मग माझी नजर वळली  कानातली-गळ्यातली दुकानांकडे. तिकडे मी काही न काहीतरी घेतेच. त्यांना निराश नाही करत कधी. :)  तिथे जवळपास १०-१२ कानातली, २-४ गळ्यातली, बांगड्या वगैरे घेऊन मोर्चा बेडशिट, कपडे या दुकानाकडे वळवला. तिथेही थोडीफार खरेदी झाली. २ पिशव्या तर इथेच भरल्या होत्या.

मग जरा तुलसी-गायत्री या घरासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मिळणारया दुकानांकडे चक्कर टाकावी असा विचार आला. घुसले गर्दीत. या तुलसी च्या बोळात मरणाची गर्दी असते. मग दिवस कोणता का असेना. मला सगळ्यात आश्चर्य वाटतं पुरुष मंडळींचं. ते या कोलाहलात का येतात कोण जाणे.  बिचारे कधी मैत्रिणीला दुखवायचं  कसं म्हणून, तर कधी बायकोला पिशव्या उचलायला येणार नाही म्हणून तिथे येतात आणि फसतात. कधी बायको खरेदी करत असताना लहान मूल कडेवर घेऊन उभे असलेले दिसतात. अर्थात काही काही स्वत: च्या इच्छेने येतात तो मुद्दा आहेच. :) तर अश्या या गच्च भरलेल्या बोळात मी शिरले, आणि कशी बशी तुलसी पर्यंत पोचले.

तिथे गेले की मला काय घेऊ काय नको असं होतं अगदी. मग काहीही गरज नसताना बरीचशी खरेदी होते. म्हणजे गेलेली असते कंगवा साफ करायचं उपकरण आणायला, पण घेऊन येते, ३-४ डबे, थोडे चमचे, बाउल, तवा/ताटल्या, फ्रीज च्या बाटल्या आणि इतर अनेक गोष्टी. नेहमीच्या या प्रथेला जागले मी आणि लागला चुना पाच-सहाशे चा इथेच. मग मी हाश्श: हुश्श: करत बाहेर आले, आणि जरा किती पैसे राहिलेत ते बघून एका सौदर्य प्रसाधने होलसेल मध्ये विकत मिळणाऱ्या दुकानात शिरले. झालं, तिथेही उगीच टाइमपास करून एखादं नेलपेंट, एखादं क्रीम वगैरे चुटपूट खरेदी करून बाहेर पडले. आता एकच पिशवी राहिली होती रिकामी आणि पैसेही फारसे उरले नव्हते. गाडी होती मंडइ जवळच्या पार्किंग मध्ये. मग म्हणलं एवढी आलेच आहे इथे तर जरा भाजी घेऊ एखादी. मग तिथेही चक्कर मारून काही भाज्या घेतल्या.

आता इतकी सगळी उलाढाल केल्यावर लक्ष्मी रोड ला जायची शक्ती नव्हती आणि पोटात कावळ्यांनी धुमाकूळ पण घातला होता. परत हातातलं सगळं लाटांबर सावरत अगत्य गाठलं. तिथे तब्येतीत सूप, चाईनीज भेळ आणि मिल्क शेक वगैरे हाणला. तसा माझा बेत खिमा पाव आणि कॅरामल पुडिंग  खायचा होता गुडलक ला जाऊन, पण  तिथे एकटीला जायला बरोबर वाटलं नाही म्हणून अगत्य वरच भागवलं. पुन्हा जाणार मी तिथे कधीतरी नवऱ्याला घेऊन.

आता ४ पिशव्या हातात, रणरणतं उन्ह डोक्यावर त्यात तुस्त जेवण झालेलं, मला खरंतर छानपैकी घरी जाऊन ताणून द्यायची इच्छा होत होती, पण २-३ पुस्तकं विकत घ्यायची होती मेहता पब्लिशिंग मधून. मग हे सगळ बारदान रचलं गाडीवर आणि आमची गाड़ी टिळक रोड कडे निघाली. मेहता च्या "T बुक क्लब" ची सभासद आहे मी.  त्या मालिकेतली २ पुस्तके आली होती, ती घेतली. पैसे कधीच संपले होते, पण कार्ड वर घेता येतात तिथे, त्यामुळे चिंता नव्हती. तसंच स्वामी, ययाती, भंडारभोग,शांताराम ही तर मला कधीपासून घ्यायची होती. ती ही घेतली हातासरशी. स्वामी, ययाती माझी २-३ दा वाचून झालीयत खरंतर, पण आपल्या संग्रही असावीत म्हणून घ्यायची होती. माझ्याकडे आता खूप पुस्तकं झाली आहेत, एक छानशी लायब्ररी आहे माझी. माझा मोकळा वेळ मजेत जातो पुस्तकात :)

तर अशी ४-५ तास उनाडक्या करून घरी आले एकदाची. येताना उसाचा रस पार्सल करून आणला होता, त्यात बर्फ टाकून प्यायले, छान पैकी ३ तास झोप काढली. नंतर नवरयाला फोन करून सांगितलं, जेवायला बाहेर जाऊ म्हणून. मग तो येईपर्यंत भंडारभोग (भंडारभोग आणि चौंडकं या पुस्तकावर जोगवा हा चित्रपट आधारलेला आहे) वाचायला घेतलं. नवरा आल्यावर  त्याला सगळ्या पिशव्या ओतून दाखवल्या, भाजीची सोडून. तो अवाक्. किती अनावश्यक वस्तू आणल्या म्हणून. ही ही.

मस्त आवरून जेवायला गेलो, येताना सीसीडी ची ब्राउनी आणि मफिन्स खाल्ले. आईशप्पथ, काय मजा आली त्या दिवशी. नवरयाची  अशक्य जळजळ झाली माझा दिवसभराचा उद्योग ऐकून. म्हणे, काय मस्त घालवलायस दिवस, अगदी तुला हवा तसा. (तो असताना इतके फिरू देत नाही मला, जे घ्यायचे आहे तेवढेच घ्यायचे आणि घरी यायचे, त्यामुळे त्यालाही बरंच वाटलं असेल की आता काही दिवस त्याच्या मागे लागणार नाही मी म्हणून.)

कधीतरी बरं वाटतं असा उनाडपणा करायला. आपण उत्साहात जास्त फिरतो, दमायला होतं थोडंसं. मी ही दमले होते,  पण हवा तसा दिवस गेल्यामुळे परत दुसरया  दिवसासाठी फ्रेशही झाले होते. विश्रांती घ्यायला लगेच येणारे शनिवार रविवार होतेच ना. मग काय.. एन्जॉय करायचं मस्त.
तुम्ही करता की नाही कधी असा उनाडपणा. एखादा दिवस असा घालवून पहा, ज्या दिवशी तुम्हीच फक्त सुट्टीवर. बाकीचे मित्र मैत्रिणी ऑफिस मध्ये काम करतायत आणि तुम्ही अशी छान मजा करताय, ही फिलिंग फार छान असते. :D

3 comments:

Maithili ३ डिसेंबर, २०१० रोजी ७:०१ PM  

सही... :-)
>>>ज्या दिवशी तुम्हीच फक्त सुट्टीवर. बाकीचे मित्र मैत्रिणी ऑफिस मध्ये काम करतायत आणि तुम्ही अशी छान मजा करताय, ही फिलिंग फार छान असते. :D
हो खर्रेच मस्त वाटते...rather ह्या कल्पनेनेच जास्त मज्जा येते... :)

Eat & Burpp ४ डिसेंबर, २०१० रोजी १:३६ PM  

अग झक्कास झालय लिखाण!!
सगळी गोतावळ तर नेहमीचीच!!
पण असा एखादा दिवस "स्व" साठी हवाच!! मांडणी छान झलिये!! मीच फिरतेय असा वाटतय!!

Ketaki Abhyankar ६ डिसेंबर, २०१० रोजी १०:३२ AM  

Thanks Gita and Maithili

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP