बालपण देगा देवा

>> शुक्रवार, २० ऑगस्ट, २०१०

 

  
"शेजारयाची बायको जास्त सुंदर वाटते "ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. शब्दश: जाऊ नका. :) त्याचा अर्थ आहे, जे आपल्याकडे नाही ते माणसाला हवं हवंस वाटतं (ती डोळे मिचकावणारी स्माइली काढायची आहे मला..कशी काढू...) तुम्हाला वाटेल, ही मुलगी वेडी तर नाही ना?, वर शीर्षक आहे बालपण वगैरे, आणि सुरुवात काय, तर शेजारयाची बायको? काळजी नसावी. म्हणूनच त्या म्हणीचा अर्थ पण लिहिला मी. आणि पुढे सांगणार पण आहे का लिहिलय ते. 

मी शाळेत असताना एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. विषय होता, "बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" 
मला हे "मुंगी साखरेचा रवा" म्हणजे काय ते तेव्हाही नव्हतं कळलं आणि अजूनही ते अज्ञान दूर झालेलं नाही. 
असो, अर्थातच तेव्हा ते भाषण माझ्या आजोबांनी मला लिहून दिलं होतं (आता जरा तरी लिहिता येतंय मला, तेव्हा काहीच अक्कल नव्हती)  आणि मी मस्त पैकी रट्टा मारला होता. पण त्यातला "बालपण देगा देवा" हा भाग मात्र तेव्हा कळला होता. लहानपण कसं छान असतं, मोठ्ठ झाल्यावर ती सगळी मजा नाहीशी होते अश्या अर्थाचं भाषण होतं ते. मला इतका राग आला होता ना तेव्हा. म्हणे लहानपण छान असतं...काहीतरीच.. उलट सगळे लोक उगीचच मागे लागायचे... पाढे म्हणून दाखव,  श्लोक म्हण, अभ्यास कर, मार्क कमी का पडले,  शाळेला उशीर का झाला, गृहपाठ का केला नाही...एक ना दोन, हजारो प्रश्न..   खेळायला जाऊ का असं म्हणलं तरी आईच्या कपाळावर सतराशे साठ आठ्या पडायच्या. तेव्हा वाटायचं, शी, काय वैताग आहे, लवकर मोठ्ठं व्हावं आणि पळून जावं इथून.
(हा राग तेव्हा लगेच मावळला , जेव्हा मला ह्या भाषणासाठी पहिलं बक्षिस मिळालं :) )   

आज या घडीला मात्र ती उक्ति पुरेपूर पटते आहे. जेव्हा रोज सकाळी लवकर उठून, स्वयंपाक करून, ९ ला ऑफिस मधे पोहोचावं लागतं, जेव्हा दमून भागून घरी परत आल्यावर देखील स्वयंपाकघर वाट पाहत असतं आणि जेव्हा तोच सगळा संसाराचा रामरगाडा अहोरात्र ओढून थकून जायला होतं, तेव्हा खरंच वाटतं, की का मोठ्ठे झालो आपण?  

अगदी शाळेत असताना फ़क्त अभ्यास करणे, आणि चांगले मार्क मिळवणे एवढच तर काम असतं. खाणे-पिणे, कपडे-लत्ते वगैरे पहायला आई-बाबा असतातच. खर्च करायचाय तर पैसा आपणच मिळवला पाहिजे ही चिंता ही नसते. ११ वी आणि १२ वी जरा धामधुमीत जातात, कारण चांगल्या कॉलेज ला प्रवेश हवा असेल तर आपणच सिंसियरली अभ्यास करतो. तेव्हाही तसे आपले लाडच होतात. "करुदे अभ्यास करतेय तर, उठवू नका तिला (कधी नव्हे ते बसलीय एका जागी - मनातल्या मनात )" असे म्हणत खायची डिश, चहा आपल्या हातात आणून  दिला जातो. 

कॉलेज मधे गेल्यावर आपल्यालाच शिंगे फुटतात, आणि पहिली २ वर्षे टाईमपास मधे जातात (माझी तरी गेली आहेत हा). मग मात्र  कॉलेज मधे campus recruitment साठी कंपन्या यायला लागल्या की धावपळ सुरु होते आणि तिथेच आपण या "Rat race" चे शिकार होतो. अपेक्षांचं ओझं पेलता पेलता, आपण कधी मोठ्ठे झालो, आणि ते रम्य बालपण मुठीतून वाळूच्या कणांसारखं कधी निसटून गेलं हे ही कळत नाही.

मग अचानक एका प्रसन्न सकाळी कुठेतरी वर्तमानपत्रात तीच ओळ दिसते, आणि मग आठवणींची पाने वाऱ्याच्या झुळकीसरशी आपोआप उलटत जातात. मग आठवते ती शाळा, ते भाषण, ते बक्षीस, आणि ते हरवलेलं बाल्य-जे आता आपल्याकडे नसतं व पुन्हा अनुभवावंस वाटतं (आठवा-शेजारयाची बायको वाली म्हण आणि तिचा वर लिहिलेला अर्थ)  आणि पुन्हा पुन्हा देवाला सांगावंस वाटतं, बालपण देगा देवा.....               





Read more...

घर पहावं बांधून

>> गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

 
 
नमस्कार मित्र-मैत्रीणीनो,
बराच मोठा ब्रेक घेतल्यानन्तर आज ज़रा वेळ मिळालाय.आणि हात तर कधीपासून शिवशिवतायत लिहिण्यासाठी (म्हणजे किबोर्ड बडवण्यासाठी :) ). खरं सांगायचं तर लिहिण्यासारख काहीतरी घडायची वाट पहात होते.

शीर्षक पाहून चतुर वाचकांच्या लक्षात आलं असेलच की अस्मादिक "घर" नावाच्या मूलभूत गरजेची पूर्तता करता करता कुठेतरी अडकून बसले होते. अगदी बरोबर. हा हा, थांबा.. बांधून हा शब्द वाचून असं तर वाटलं नाही ना तुम्हाला, की मी बंगला वगैरे बांधलाय? तेवढी लायकी पण नाही आणि ऐपत तर नाहीच नाही. या पुण्यनगरीत बंगला बिंगला बांधणे म्हणजे काय खाऊ आहे का राव? पु.लं च्या भाषेत, जन्मदात्याने तरी ही बंगल्याची सोय केलेली हवी किंवा नवरयाच्या तिर्थरुपानी तरी.  नाहीतर आपल्यासारख्या पामरांचा काय पाड लागणार इथे.


तर बंगला वगैरे नाही, पण एक छानसा २ BHK फ्लैट घेतला. आणि आत्ता कुठे त्या गडबड़ीतून जरा मोकळा श्वास घेतेय. त्या बिल्डर ने फार पकवल आम्हाला. हे लोक ना पुढ़ारयांसारखे असतात. नुसती आश्वासने द्यायची. नाही कळल ? सांगते..
आम्ही जेव्हा घर बुक केलं तेव्हा ते जवळ जवळ ९०% बांधून पूर्ण झालेलं होतं. तेव्हा आम्हाला सांगण्यात आले, की बस २ महिन्यात नक्की ताबा देणार. (आश्वासन १) त्याच्या पुढे ५-६ महिने झाल्यावर आणि आम्ही त्याच्या पूर्वजांच्या भुतासारखे त्याच्या मानगुटीवर बसल्यावर कसंतरी उरकाउरक करून पझेशन दिलं. काही जास्तीच्या गोष्टी करून घ्यायच्या होत्या, जस की सर्व्हिस ओटा, जास्तीच बेसिन इ.इ. त्या ही करून द्यायला सांगितल्या. २ दिवसात होइल असे आश्वासन २ मिळालं.
पण कसचं काय! त्यात गेले २ महिने. वस्तुशांतिची तारीख १५ दिवसांवर आली. मग मात्र बिल्डर ऑफिस ला जाउन सज्जड  दम भरला. (हो हो मीच. हे काम बरं जमतं मला) शेवटी सगळी पेंडिंग कामे होउन आम्ही पूजा करून घेतली.

बिल्डर कड़ून तर सगळं काम झालं. पण आता नातेवाईक, घरचे लोक या सगळ्यांकडून वेगवेगळी मते यायला लागली. आधीच फर्नीचर करून घ्या, नंतर घर घाण होतं हा सल्ला महत्वाचा होता. चला एवढे पैसे घालतोच आहोत तर हे पण करून टाकू, असा ठराव सर्वानुमते पास झाल्यावर परत २ महिन्यांची निश्चिंती झाली.
मग आर्किटेक्ट कड़े जा, डिझाइन्स फायनल करा, स्वत:ची अक्कल पाजळा,  काहीतरी बदल सुचवा, यांव रंग, त्यांव सनमाईका असले उद्योग सुरु झाले. १०० वेळा तिथे जाउन सुतार, पेंटर याना सूचना करणं ओघाने आलंच. त्यात घराचा हप्ता सुरु झालेला. आम्ही भाड्याच्या घरात. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ घालण हेही एक मोठ्ठ काम होतं. पण स्वत:चं घर असं छान आपल्या नजरेसमोर साकार होताना स्टेप बाय स्टेप पहाण्यातली मजा काही औरच असते आणि ती आम्ही पुरेपुर अनुभवली.

प्रत्येकाने हे उद्योग कधी ना कधी केलेले असतील, ज्यानी नाही केले, ते नजीकच्या भविष्यकाळात यातून जातील यात काही शंका नाही. पण प्रत्येकाचे अनुभव नवीन असतील आणि ते अनुभवण्यातल सुख खरंच अवर्णनीय असतं हे मी नक्की सांगेन.    

आता १५ दिवस झाले आम्ही नव्या घरी रहायला येउन. आजकाल Movers and Packers मुळे सामान हलवणे एकदम सोप्पे झालेय. त्यामुळे २ दिवसात सगळ्या वस्तू जागच्या जागी विराजमान झाल्या. खूप छान वाटतंय, आपल्या स्वकष्टाच्या कमाईच्या घरात राहताना. नवीन नवीन स्वप्ने पहाताना. आणि त्या स्वप्नांना साकार होताना बघताना.
तुम्हा सगळ्याना नवीन नवीन वास्तू/घरे  घेण्यासाठी माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा!!!

ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफ़ळ सम्पूर्ण!! (श्रावण चालू आहे ना, शेवटच वाक्य लिहिल्याशिवाय कहाणी संपत नाही चातुर्मासात :) )  




Read more...

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP