कशासाठी..गाण्यासाठी...

>> बुधवार, १३ जानेवारी, २०१०

वाचकहो.. तुमच्या सारख्या जाणकारांना एव्हाना कळलेच असेल की मी आता गाण्याबद्दल काहीतरी लिहिणार आहे ते. खरंय.. मी माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर आणि कार्यक्रमावर बोलणार आहे.
अर्थातच तुमचा , माझा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम, "सा रे "

"कलेला भाषा, धर्म, जात, प्रांत कशाच्याच सीमा नसतात. ती फ़क्त सादर करायची असते." असे कुणीतरी म्हणलंच आहे. (कुणीतरी म्हणजे मीच. पण "कुणीतरी" असे म्हणलं की जरा लोक नीट वाचतात, हा आपला मला आलेला एक अनुभव) हे अगदी शब्दश: खरं ठरावं अशीच परिस्थिति सध्या "सा रे " मधे आहे. मला मनापासून कौतुक वाटतं "राहुल सक्सेना" आणि "अभिलाषा चेल्लम" या दोघांचं. एक उत्तरेकडचा आणि एक दक्षिणेतली. आणि पश्चिमेत येउन हे लोक आपली कला इतकी उत्तम सादर करतायत ना की फ़क्त "वाह वाह, अप्रतिम" एवढच म्हणत रहावंसं वाटतं..गाण्यावरची अढळ निष्ठा... भाषा हा अडथळा न मानता फ़क्त आणि फ़क्त गाण्यासाठीच गातात असे वाटत. संत नामदेवांनी आपल्या एका अभंगात म्हणलच आहे "टाळ मृदुंग, दक्षिणेकड़े, माझे गाणे पश्चिमेकडे". शेवटी मराठी गाणी गायला आणि ऐकायला गोडच(तसं गायला अवघड आहे..असो) . त्यामुळे उत्तर, दक्षिण सगळीकड़च्याना मराठी गाणी गावीशी वाटली यात काही नवल नाहीच. "
ळ", "ण", "च" हे सगळे उच्चार ही दोघे इतके स्पष्ट करतात की कुणाला सांगून देखिल पटणार नाही की हे अमराठी आहेत. भावगीत, अभंग, हिप हॉप, लावणी सगळ्याच प्रकारात ही दोघे उत्कृष्ट आहेत. "नटरंग" या चित्रपटातील प्रसिध्द लावणी "मला जाऊदया ना घरी" अभिलाषा च्या तोंडून ऐकताना खूपच सुरेख वाटली. सगळे लटके , झटके, मुरके एकदम सटाक... अवधूत च्या भाषेत "नाद खुळा". तसेच राहुल चे, "खेळ मांडला" एकदम संयत, पक्क्या सुरांचे आणि गाण्यातील भावना बोलून दाखवणारे होते.
परीक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया बाबतीत देखिल ही दोघे अव्वल आहेत. पण....
हा पण येतोच बघा मधे.. केवळ ते अमराठी आहेत म्हणून त्याना मते कमी मिळतायत. एरवी मराठीच्या मुद्द्यावरून मुंबई पेटलेली असते. "बाहेरचे लोक येतात, मुंबई घाण करतात, महाराष्ट्रात राहूनही मराठी बोलत नाहीत इ.इ." वादंग उठवणारे लोक आता शांत का बरं? उलट २ अमराठी मुलाना मराठीत गाणी गाताना पाहून यांना अत्यानंद व्हायला हवा. मतांसाठी या लोकानी आवाहन केले तर नक्कीच काहीतरी फरक पडेल.असो..
स्पर्धा काय होतच राहतील. आत्ता नाही तर पुढे कधीतरी हे तारे अत्त्युच्च ठिकाणी पोचणार यात काही शंका नाही.
तेव्हा तुम्ही आम्ही छानपैकी संगीताचा आनंद लुटुया... काय म्हणता?




  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP