आमचा बॉस आणि आम्ही

>> सोमवार, १८ जानेवारी, २०१०

बरेच दिवस काहीच न लिहिल्यामुळें डोक्यात अनेक विचार साचून राहिलेत. आणि तेंडुलकरने सटासट षटकार ठोकावेत, अगदी तसेच ते मेंदूच्या आतल्या आवरणावर सटासट धड़का मारतायत. ज्या धड़कने डोक्यात सर्वात जास्त कळ आली तो विषय मी लिहायला निवडला.

आता शीर्षक वाचून तुम्ही गोंधळात पडला असाल. पुणे विद्यापीठाचे कुलगुरु आणि प्रख्यात अर्थ-तज्ञ डॉ.नरेद्र जाधव यांनी लिहिलेल्या "आमचा बाप आणि आम्ही" या पुस्तकाशी साधर्म्य साधणारे काही आहे की काय हे? तर तसे काही नाही..नावाशी साधर्म्य आहे फ़क्त.

मला सांगा, आपल्यासारखी सामान्य माणसे स्वत:ला "आम्ही" म्हणतील का? (आपण काय UP वाले नाही स्वत:ला "हम" म्हणायला :) ) पण सामान्याला असामान्य आणि असामान्याला सामान्य करणारी एक शक्ती आहे आणि ती प्रत्येकाकड़े आहे, ती म्हणजे विचार. फ़क्त असा विचार करायचा की मी म्हणजे कोणीतरी "ग्रेट" आहे, आणि झोपायचं. की लगेच "मनी वसे ते स्वप्नी दिसे" या उक्तीचं "implementation" सुरु......

म्हणजे असा विचार करा, की तुम्ही चक्क पेशवे आहात. (आता इतक्यात तरी पुन्हा नवे पेशवे जन्माला येतील असे वाटत नाही, पण स्वप्न बघायला काय जातंय?) हा, तर पुढे.. तुम्ही जोरात ओरडताय, "सेवका, एवढेही कळत नाही? आम्ही आल्याची खबर देखिल नाही? जा सत्वर, आम्हास शीत जल घेउन ये" आणि हा सेवक, दुसरे तिसरे कोणी नसून तुमचा बॉस आहे.. हे होतं शीर्षकाचं विवरण. तर आता नमनाला घडाभर तेल न घालता शीर्षकाचं विवेचन ही सुरु करते.

आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही म्हणजे मीच आणि आयुष्याच्या २७ वर्षाच्या कालावधीत सर्वात कमी काळात सर्वात जास्त छळ मांडणारा प्राणी म्हणजे माझा बॉस. सकाळी ऑफिसला आल्या मिनिटापासून ते जाईपर्यंत नुसती कारणे मागत राहतो. "आज उशीर का झाला? आज कसे काय लवकर आलात? काम झालं का? का नाही झालं? लंच ला एवढा वेळ का? चहा घ्यायला १५ मि. लागतात का? नुसतं "प्रश्नचिन्ह" कोरलेलं असतं चेहऱ्यावर. बघावं तेव्हा "कारणे दाखवा" नोटिस पुढे करत राहतो. त्यात एक अख्खं वाक्य काही एका दमात बोलत नाही. अर्धं वाक्य झालं की अड़कलाच गीअर. म्हणजे प्रश्नांची सरबत्ती सुरु असेल, तर "why" नंतर २-५ मि. टेप अड़कलेली असते. keep guessing.... आपण मनात भरपूर "Permutations & combinations" करून उत्तरे तयार ठेवायची. नाहीतर नव्या लूप मधे अड़कायची भिती.

अचानक एखाद्या वेळी कोपरयातून एक आवाज येतो, "अरे ए....." की मग सगळे "अरे" बळी जाण्याची वाट पाहत राहतात. (मी सेफ असते ;) ) एक दिवस तर "New year resolutions" या विषयावर ५ तास मीटिंग... सगळा जेवणाचा विचका. पण या मीटिंग मधे एक सव्वाशेर भेटला या शेराला(की पावशेराला?)
नवीन लग्न झालेला एक लग्नाळलेला जीव तो. त्यात ६ वाजून गेलेले, आणि अर्थातच त्याला घरी पळायची घाई.
त्याने काहीच्या काही उत्तर दिले, "मी लवकर झोपणार आणि लवकर उठणार" कारण "लवकर उठे, लवकर निजे, तया ज्ञान,आरोग्य, संपत्ती लाभे". बॉस अवाक्. आत्तापर्यंत सर्वांनी "Technical" संकल्प सोडले होते, याने "Domestic" संकल्प सोडला. मग काय, "तखलिया" असे पुटपुटत बॉस अदृश्य झाला. त्या "Colleague" ला सगळयांनी नंतर खूप पिडलं ते वेगळं, पण त्याचा उद्देश मात्र सफल झाला, बॉस ला गप्प बसवण्याचा. तर एकूणच "मिटींग मिटींग" खेळणे हा आवडता उद्योग. एकदा तर म्हणे त्याची सासू गेली(गेली म्हणजे वर गेली) आणि त्यानंतर ह्याने "माणूस मेल्यावर जाळावे की पुरावे" यावर मिटींग घेतली. आहे की नाही अवघड? असा आमचा बॉस. समोरच्याला उत्तरे माहीत नसतील असे पश्न हुडकून विचारण्यात एकदम तरबेज. १० लोकांमधे एकाला पकड़ायचं आणि त्याला आपला वजीर बनावुन इतर गरीब जनतेवर(म्हणजे आम्ही इतर. मुकी बिचारी कुणीही हाका) सोडून द्यायचं. मग हा वजीर स्वत: राजा असल्यासारखा हवेतच कायम. मग एखाद्यानं त्याची हवा काढायची आणि अर्थात स्वत:त भरून घ्यायची. की मग आम्ही "सत्तांतरण" हा विषयावर बोलायला मोकळे.

याने एकतर वकील व्हायला हवं होतं किंवा राजकारणी.. पण भलतीकडेच आली गाड़ी आणि आमच्या इवलुश्या डब्यांना धड़कली. पुढचा इतिहास तर तुम्हाला कळलाच आहे. काही दिवसानी आम्ही इतिहासजमा होऊ पण हे पिवळं पान देठ मोडून हिरव्यात शिरायचं काही सोडणार नाही. असो... हे एवढेच कारनामे नाहीयेत.
कारनामे -> इनफिनिटी...... :D

आता या रामायणाचा शेवट जरा चांगला करावा. त्याच्यात अगदी काहीच चांगलं नाही असे नाही. कुठल्याही गोष्टीचा प्रचंड अभ्यास करणे ही वृत्ती. जी गोष्ट interesting वाटेल तिचा पार मुळापर्यंत जाउन शोध घेइल. (नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोधू नये म्हणतात, हा ते देखील करेल, बघाच तुम्ही..) एखाद्याचा पार पिच्छा पुरवेल, पण मग या सगळ्यातून जे काही निघेल ते बावनकशी सोनं (ही फार म्हणजे फार चांगली उपमा आहे. एवढ seriously घेऊ नका) असेल. ते ज्ञान इतराना देइल, काही हातचं राखून. पण मग त्यातून नवे प्रश्न अणि नवे लूप तयार होणे अपरिहार्य... अजुन एक चांगलं म्हणजे एखादी Dead-line अगदी जवळ येत नाही तोवर फारशी ढवळाढवळ करत नाही. सततच दडपणाखाली राहणं कुणाला आवडेल? त्यावेळी त्याच्या दृष्टीने ऑफिस मधली सर्वात दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट म्हणजे employee.

प्रत्येकाच्या बॉस मधे हा असा नमूना कुठे ना कुठे तरी दडलेला असतोच. पण आजकाल कॉपीराईट हे एक मोठं प्रस्थ झालंय. त्यामुळे, या लिखाणाच्या सुरुवातीला किंवा शेवटी, एखादा "Disclaimer" टाकावा की काय असा विचार चालू आहे. "वरील घटना किंवा व्यक्ति यांचे प्रत्यक्ष जीवनात काही साधर्म्य आढ़ळल्यास योगायोग समजावा"

[हा लेख माझ्या बॉसने वाचला तर? तर काय होइल, "Disclaimer" आहेच ना.. आल इज वेल चाचू]








Read more...

कशासाठी..गाण्यासाठी...

>> बुधवार, १३ जानेवारी, २०१०

वाचकहो.. तुमच्या सारख्या जाणकारांना एव्हाना कळलेच असेल की मी आता गाण्याबद्दल काहीतरी लिहिणार आहे ते. खरंय.. मी माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर आणि कार्यक्रमावर बोलणार आहे.
अर्थातच तुमचा , माझा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम, "सा रे "

"कलेला भाषा, धर्म, जात, प्रांत कशाच्याच सीमा नसतात. ती फ़क्त सादर करायची असते." असे कुणीतरी म्हणलंच आहे. (कुणीतरी म्हणजे मीच. पण "कुणीतरी" असे म्हणलं की जरा लोक नीट वाचतात, हा आपला मला आलेला एक अनुभव) हे अगदी शब्दश: खरं ठरावं अशीच परिस्थिति सध्या "सा रे " मधे आहे. मला मनापासून कौतुक वाटतं "राहुल सक्सेना" आणि "अभिलाषा चेल्लम" या दोघांचं. एक उत्तरेकडचा आणि एक दक्षिणेतली. आणि पश्चिमेत येउन हे लोक आपली कला इतकी उत्तम सादर करतायत ना की फ़क्त "वाह वाह, अप्रतिम" एवढच म्हणत रहावंसं वाटतं..गाण्यावरची अढळ निष्ठा... भाषा हा अडथळा न मानता फ़क्त आणि फ़क्त गाण्यासाठीच गातात असे वाटत. संत नामदेवांनी आपल्या एका अभंगात म्हणलच आहे "टाळ मृदुंग, दक्षिणेकड़े, माझे गाणे पश्चिमेकडे". शेवटी मराठी गाणी गायला आणि ऐकायला गोडच(तसं गायला अवघड आहे..असो) . त्यामुळे उत्तर, दक्षिण सगळीकड़च्याना मराठी गाणी गावीशी वाटली यात काही नवल नाहीच. "
ळ", "ण", "च" हे सगळे उच्चार ही दोघे इतके स्पष्ट करतात की कुणाला सांगून देखिल पटणार नाही की हे अमराठी आहेत. भावगीत, अभंग, हिप हॉप, लावणी सगळ्याच प्रकारात ही दोघे उत्कृष्ट आहेत. "नटरंग" या चित्रपटातील प्रसिध्द लावणी "मला जाऊदया ना घरी" अभिलाषा च्या तोंडून ऐकताना खूपच सुरेख वाटली. सगळे लटके , झटके, मुरके एकदम सटाक... अवधूत च्या भाषेत "नाद खुळा". तसेच राहुल चे, "खेळ मांडला" एकदम संयत, पक्क्या सुरांचे आणि गाण्यातील भावना बोलून दाखवणारे होते.
परीक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया बाबतीत देखिल ही दोघे अव्वल आहेत. पण....
हा पण येतोच बघा मधे.. केवळ ते अमराठी आहेत म्हणून त्याना मते कमी मिळतायत. एरवी मराठीच्या मुद्द्यावरून मुंबई पेटलेली असते. "बाहेरचे लोक येतात, मुंबई घाण करतात, महाराष्ट्रात राहूनही मराठी बोलत नाहीत इ.इ." वादंग उठवणारे लोक आता शांत का बरं? उलट २ अमराठी मुलाना मराठीत गाणी गाताना पाहून यांना अत्यानंद व्हायला हवा. मतांसाठी या लोकानी आवाहन केले तर नक्कीच काहीतरी फरक पडेल.असो..
स्पर्धा काय होतच राहतील. आत्ता नाही तर पुढे कधीतरी हे तारे अत्त्युच्च ठिकाणी पोचणार यात काही शंका नाही.
तेव्हा तुम्ही आम्ही छानपैकी संगीताचा आनंद लुटुया... काय म्हणता?




Read more...

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP